गुरुवार, दि. २ मे
लोकसभा निवडणुकीचे वातावरण राज्यात चांगलेच तापले आहे. निवडणुकीचे दोन टप्पे पार पडल्यानंतर राज्यात प्रचार सभांनी आता मोठा वेग घेतला आहे. पंतप्रधानांपासून राज्यातील बडे बडे नेते आपल्या पक्षाच्या उमेदवारांसाठी राज्यात सभा घेत असतानाच महाविकास आघाडीतील काँग्रेसचे स्टार प्रचारक, प्रमुख नेते, भूमिपुत्र बाळासाहेब थोरात यांच्या प्रचार सभांना देखील राज्यातून मोठी मागणी असून काँग्रेससह महाविकास आघाडीचा किल्ला राज्यात ठीक-ठिकाणी लढवितांना थोरात दिसत आहे.
राज्यात पहिल्या टप्प्यात पूर्व विदर्भ व दुसऱ्या टप्प्यात पश्चिम विदर्भातील निवडणुका पार पडल्या. या मतदारसंघातील नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया, रामटेक, अमरावती, नांदेड, हिंगोली येथे थोरात यांच्या प्रचार सभा झाल्या. काँग्रेस नेते खासदार राहुल गांधी, सरचिटणीस प्रियंका गांधी, पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या सोबतच्या सभांमध्ये देखील थोरात यांचा सहभाग होता.
राज्यात नॅशनॅलिस्ट काँग्रेस पार्टीचे प्रमुख शरद पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, शिवसेनेचे प्रमुख माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, शिवसेना नेते संजय राऊत यांच्या समवेत देखील विविध ठिकाणी थोरात यांनी सभांना हजेरी लावली. थोरात यांच्याकडे राज्याबरोबरच उत्तर महाराष्ट्राची महत्त्वाची जबाबदारी असल्यामुळे त्यांनी नाशिक, धुळे, जळगाव, नंदुरबार, अहमदनगर, शिर्डी मधील महाविकास आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी सभा घेतल्या.
नासिक, धुळे, जुन्नर, सासवड, पुणे, कोल्हापूर, सांगली या ठिकाणीही थोरात यांच्या सभा पार पडल्या. राज्यातील फोडाफोडीचे राजकारण सर्वसामान्य जनतेला मान्य नसल्याचे या प्रचार दौऱ्यातून दिसून येत आहे. काँग्रेसची एकनिष्ठ असलेल्या थोरात यांची राज्यात सुसंस्कृत नेतृत्व म्हणून तसेच यशवंतराव चव्हाण यांचे वारसदार म्हणून ओळख आहे. थोरात यांनी राज्याच्या मंत्रिमंडळात महसूल, कृषी, शिक्षण, रोजगार हमी, जलसंपदा असे महत्त्वाचे खाते सांभाळले आहे. याशिवाय त्यांनी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि राष्ट्रीय पातळी काँग्रेस वर्किंग कमिटी सदस्य हिमाचल, गुजरातचे निरीक्षक पद देखील सांभाळले आहे.
यामुळेच पुरोगामी विचारांचा वारसा सांगणाऱ्या या नेत्याच्या सभांना राज्यातून मोठ्या प्रतिसाद लाभत असल्याचे दिसून येते. थोरात यांनी अहमदनगर व शिर्डी लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीच्या उमेदवारांसाठी देखील गावोगावी प्रचार दौऱ्याच्या नियोजन केले आहे.
देशात भाजपा विरोधात तर राज्यात महायुती विरोधात मोठी लाट निर्माण झाले असून जनतेचे प्रश्न सुटू शकलेले नाहीत. मतदार आता इंडिया आघाडीच्या बाजूने उभा राहिला आहे. त्यामुळे अहमदनगर, शिर्डीसह राज्यात महाविकास आघाडीला ४० पेक्षा अधिक तर देश पातळीवर एनडीएला साडेतीनशे पेक्षा अधिक जागा मिळतील असा विश्वास थोरात व्यक्त करताना दिसतात.


