महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन, संगमनेर:
महाराष्ट्र आणि देशाच्या समृद्ध इतिहासातून प्रेरणा घेऊन निरोगी व प्रगल्भ समाज घडवण्यासाठी तरुणांनी राज्यघटना, लोकशाही आणि संत परंपरेचा विचार आत्मसात करणे काळाची गरज आहे. याच उदात्त हेतूने कॅन्सरतज्ञ डॉ. जयश्री थोरात यांच्या संकल्पनेतून साकारलेला ‘युवा संगम’ हा कार्यक्रम भविष्यात संपूर्ण महाराष्ट्रासाठी एक आदर्श मार्गदर्शक ‘पॅटर्न’ ठरेल, असा विश्वास राजकीय क्षेत्रातील दिग्गजांनी व्यक्त केला आहे.
सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखाना कार्यस्थळावर संगमनेर तालुका युवक काँग्रेस आणि एनएसयुआय यांच्या संयुक्त विद्यमाने दोन दिवसीय युवा संगम कार्यकर्ता शिबिर व संवाद कार्यक्रम नुकताच उत्साहात पार पडला. या शिबिरामध्ये संगमनेर तालुक्यातील ५६० युवक-युवतींनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवत सामाजिक आणि राजकीय विचारांचे आदानप्रदान केले.
या महत्त्वपूर्ण कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी माजी मंत्री आमदार सतेज पाटील, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात, ज्येष्ठ नेते उल्हासदादा पवार, युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष शिवराज मोरे, प्रवक्ते हनुमंत पवार, एनएसयुआयचे प्रदेशाध्यक्ष सागर साळुंखे आणि माजी नगराध्यक्ष दुर्गाताई तांबे, युवक काँग्रेसच्या राज्य उपाध्यक्ष सय्यद आफरीन मुजफ्फर हुसेन, ऋषिकेश पाटील, बालाजी गाडे, संग्राम खोपडे गिरीजा पिचड, राहुल उगले यांच्यासह विविध राज्यांतील पदाधिकारी व युवक काँग्रेसचे वरिष्ठ प्रतिनिधी उपस्थित होते. ५६० युवा कार्यकर्त्यांच्या निवासाची व बैठकीची सुसज्ज व्यवस्था, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर असलेले व्यासपीठ, एलईडी स्क्रीन आणि प्रश्नोत्तरांचे तास हे या कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण ठरले.
दोन दिवसांच्या या मंथनात लोकशाहीची मूल्ये, भारतीय राज्यघटनेचे महत्त्व, वारकरी संप्रदायाचा सर्वसमावेशक विचार, स्वातंत्र्यलढ्याचा इतिहास आणि आधुनिक भारताच्या उभारणीत तरुणांचे योगदान यांसारख्या विविध विषयांवर सखोल चर्चा करण्यात आली. सध्या देशासमोर उभी असलेली आव्हाने आणि तरुणांच्या जबाबदाऱ्या यावरही मान्यवरांनी मार्गदर्शन केले.
आमदार सतेज पाटील यांनी आपल्या भाषणात संगमनेरच्या विकासाचा गौरव केला. पन्नास वर्षांपूर्वीचा संगमनेर आणि आजचा प्रगत संगमनेर हा लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या दूरदृष्टीचा परिणाम असल्याचे सांगून त्यांनी हे नेतृत्व मिळणे संगमनेरचे भाग्य असल्याचे नमूद केले. तसेच, डिजिटल मीडियाच्या माध्यमातून पसरवल्या जाणाऱ्या चुकीच्या माहितीला कार्यकर्त्यांनी आक्रमकपणे आणि तथ्यांच्या आधारे उत्तर द्यावे, असे आवाहनही त्यांनी केले.
ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी सध्याचा काळ संघर्षाचा असला तरी तो तत्त्वांच्या लढाईचा असल्याचे सांगत येणारा काळ निश्चितच काँग्रेसचा असेल, असा विश्वास व्यक्त केला.
ज्येष्ठ नेते उल्हासदादा पवार यांनी धार्मिकतेच्या राजकारणावरून भाजपवर टीका करताना देशात द्वेषभावना वाढवली जात असल्याबद्दल चिंता व्यक्त केली. तर शिवराज मोरे, संग्राम खोपडे, ऋषिकेश पाटील आणि बालाजी गाडे यांनी सोशल मीडियावरील ‘फेक नॅरेटिव्ह’ खोडून काढत सत्याची बाजू मांडण्याचे आणि ग्रामसभेसारख्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्रक्रियेत सक्रिय सहभाग घेण्याचे आवाहन तरुणांना केले.
या कार्यक्रमाचे विशेष आकर्षण ‘कॉफी विथ थोरात साहेब’ हे सत्र ठरले. यामध्ये तालुक्यातील युवकांनी विचारलेल्या विविध प्रश्नांना बाळासाहेब थोरात यांनी अत्यंत दिलखुलासपणे उत्तरे दिली, यामुळे नेत्यांशी थेट संवाद साधण्याची संधी तरुणांना मिळाली. समारोप प्रसंगी डॉ. जयश्री थोरात म्हणाल्या की, या शिबिरातून तरुणांनी राष्ट्रप्रेमाचा जो विचार घेतला आहे, तो घेऊन त्यांना लोकशाहीच्या बळकटीकरणासाठी काम करायचे आहे.
संगमनेरने नेहमीच राज्याला दिशा देण्याचे काम केले आहे. संकटाच्या काळातही विचारांशी एकनिष्ठ राहणारे नेतृत्व आणि डॉ. जयश्री थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली झालेला हा यशस्वी ‘युवा संगम’ आगामी काळात महाराष्ट्रातील युवक राजकारणाला नवी दिशा देणारा ठरेल, असा सूर या शिबिरात उमटला.






