रविवार, दि. ५ मे
महायुतीचे आपले सरकार सर्वांना सोबत घेऊन जाणारे आहे. विकासाच्या मुद्द्यावर आपण निवडणूक लढवत आहोत. जिथे जातो तिथे जनता बाळासाहेबांच्या विचारांना आणि विकासाला मत देणार असल्याचे सांगते. त्यामुळे येथेदेखील धनुष्यबाणाच्या खटक्यावर बटन दाबून जनता उबाठाचा टांगा पलटी घोडे फरार करेल, निवडणुकीत मशालीची चिलीम होईल अशी टीका राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे.
शनिवारी मुख्यमंत्री कोल्हापूरमधील हातकणंगले लोकसभा मतदारसंघात महायुतीच्या उमेदवाराच्या प्रचारार्थ बोलत होते.
मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, धनुष्यबाणाशी गद्दारी करणाऱ्यांना तुम्ही माफ करणार का? बाळासाहेबांच्या विचारांशी गद्दारी करणारांना माफ करणार का? विकास करताना जातीभेद केला नाही. या राज्यातील नागरिकांना चांगल्या सोयी सुविधा मिळाल्या पाहिजेत. कोल्हापुरातील टोल बंद करण्याचा निर्णय आपण घेतला. मराठा समाजाला आपण आरक्षण दिले. विरोधकांनी सत्तेत असताना फक्त मराठा समाजाचा वापर केला. हे सरकार देणारे सरकार आहे. तुम्ही एक हाताने दिले तर सरकार तुम्हाला दोन हाताने देईल. आपले सरकार बुलेट ट्रेनच्या स्पीडने काम करत आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना काँग्रेसने पराभूत केले. इतकी वर्ष सत्तेत असताना काँग्रेसला संविधान दिन साजरा करावा वाटला नाही. आता म्हणतात संविधान बदलणार पण जोपर्यंत चंद्र सूर्य आहे तोपर्यंत संविधान नाही बदलणार. ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेली भूमी आहे. हे महायुतीचे सरकार सर्वांना सोबत घेऊन जाणारे सरकार आहे.
पूर्वीचे सरकार कमिशन आणि कट मागू लागले तसे उद्योजक राज्यातून पळून गेले. पण महायुतीचे सरकार आल्यानंतर उद्योजक पुन्हा राज्यात येत आहेत. केंद्रात १० वर्षात केलेले काम आणि राज्यात दोन वर्षात केलेले काम याची पोचपावती मतदारांनी दिली पाहिजे. काँग्रेसचे उमेदवार मतदार संघ शोधत आहेत. वायनाडनंतर आता रायबरेली कारण त्यांना स्वतःच्या विजयाची खात्री उरलेली नाही, असे लोक देशाचे काय नेतृत्व करणार अशी टीका मुख्यमंत्र्यानी केली.
आपल्याला ५६ इंचाची छाती असणारा पंतप्रधान हवा आहे. महाराजांच्या वारसांना राज्यसभेचे तिकीट दिले नाही याबाबत उबाठानी शेण खाल्ल्याची कबुली दिली. राम भक्तांना हरामखोर म्हणणाऱ्या सोबत हातमिळवणी करून त्यांनी तेच खाल्ले आहे अशी टीका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली. २०१९ मध्ये बाळासाहेबांचे विचार सोडून काँग्रेस सोबत घरोबा केला आणि त्यांनी जनतेचा विश्वासघात केला. जनतेने शिवसेना भाजप युतीसाठी मतदान केले होते. आपले सरकार फिल्डवर जाऊन काम करणारे असल्याचे ते म्हणाले.


