रविवार, दि. १२ मे
संगमनेर विधानसभा निवडणूक प्रमुखपदी पक्षीय पातळीवर संजय गांधी निराधार योजनेचे अध्यक्ष अमोल खताळ पाटील यांची भारतीय जनता पक्षाने निवड केली आहे.
शिर्डी येथे झालेल्या भारतीय जनता पक्षाच्या बैठकीत ही निवड करण्यात आली. लगोलग भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी खताळ यांना निवडीचे नियुक्तीपत्र दिले.
शिर्डी येथे झालेल्या बैठकीवेळी केंद्रीय राज्यमंत्री भागवत कराड, मंत्री दादा भुसे, मंत्री शंभूराजे देसाई, खासदार सदाशिव लोखंडे, आमदार आशिष देशमुख, माजी आमदार वैभव पिचड, माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे, धनराज विसपुते, भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष विठ्ठलराव लंघे, माजी जिल्हाध्यक्ष राजाभाऊ गोंदकर, सरचिटणीस नितिन दिनकर, नितीन कापसे, जालिंदर वाकचौरे, सीताराम भांगरे यांच्यासह उत्तर अहमदनगर जिल्हा पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
या बैठकीत विधानसभा निवडणूक प्रमुखपदाची घोषणा करण्यात आली. खताळ यांनी लाभार्थ्यांना संजय गांधी निराधार योजनेसह इतरही शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले.
महसूलमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली माझी निवड झाली आहे. पक्षाची ध्येय, धोरणे तळागाळापर्यंत पोहचविण्याचा, नागरिकांसाठी असलेल्या विविध शासकीय योजनांचा लाभ लाभार्थ्यांना मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार आहे. – अमोल खताळ.


