माजी मंत्री बाळासाहेब थोरात, माजी मंत्री राम शिंदे, उमेदवार उत्कर्षा रूपवते यांनी परिवारासह बजावला मतदानाचा हक्क
शिर्डी लोकसभा मतदारसंघात सकाळी नऊ वाजेपर्यंत ६.४% मतदान
अहमदनगर लोकसभेसाठी ५.६८% मतदान
सोमवार, दि. १३ मे
लोकसभा निवडणुकीसाठी १० राज्यातील ९६ मतदार संघात चौथ्या टप्प्यातील मतदानाला सकाळी सात वाजता सुरुवात झाली आहे. यात राज्यातील महत्त्वपूर्ण ठरणाऱ्या ११ जागांचा समावेश आहे.
अहमदनगर, शिर्डी, बीड, पुणे, शिरूर, मावळ, छत्रपती संभाजी नगर, जालना, धुळे, रावेर आणि नंदुरबार या राज्यातील पंधरा जागांचा आज होत असलेल्या मतदानात समावेश आहे. सत्ताधारी महायुती आणि महाविकास आघाडी या दोघांसाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची असल्याने या जागांवरून मातब्बरांचे भवितव्य आज मतदान यंत्रात बंद होईल.
राज्यातील महाविकास आघाडीचे महत्त्वाचे असणारे नेते काँग्रेसचे ज्येष्ठ आमदार माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी शिर्डी लोकसभा मतदारसंघात त्यांच्या मूळ गावी जोर्वे ता संगमनेर येथे सकाळीच मतदान केले. तर याच मतदारसंघातील वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवार उत्कर्षा रुपवते यांनी अकोले विधानसभा मतदारसंघातील अकोले येथे मतदान केले. याशिवाय माजी मंत्री आमदार राम शिंदे यांनी अहमदनगर लोकसभा मतदारसंघासाठी जामखेड तालुक्यातील श्रीक्षेत्र चोंडी येथे मतदानाचा हक्क बजावला.
चौथ्या टप्प्यात या राज्यांमध्ये मतदान होत आहे (कंसात मतदान होत असलेल्या जागांची संख्या)
आंध्र प्रदेश (२५)
बिहार (५)
जम्मू आणि काश्मीर (१)
झारखंड (४)
मध्य प्रदेश (८)
महाराष्ट्र (११)
ओडिशा (४)
तेलंगणा (१७)
उत्तर प्रदेश (१३)
पश्चिम बंगाल (८)

राज्यातील आज होणाऱ्या ११ मतदार संघातील लढती पुढीलप्रमाणे…
शिर्डी : सदाशिव लोखंडे, भाऊसाहेब राजाराम वाघचौरे व उत्कर्षा रुपवते यांच्यात तिरंगी लढत होत आहे.
अहमदनगर : सुजय विखे पाटील विरुद्ध निलेश लंके यांच्यात दुरंगी लढत होत आहे.
शिरूर : अमोल कोल्हे व शिवाजीराव आढळराव पाटील यांच्यात लढत होत आहे.
पुणे : रवींद्र हेमराज धंगेकर, वसंत मोरे व मुरलीधर मोहोळ यांच्या तिरंगी लढत होत आहे.
बीड : पंकजा मुंडे व बजरंग सोनवणे यांच्यात सरळ लढत होत आहे.
मावळ : श्रीरंग बारणे व संजोग वाघरे पाटील यांच्यात सरळ लढत होत आहे.
औरंगाबाद : संदिपान भुमरे व चंद्रकांत खैरे यांच्यात लढत होत आहे.
नंदुरबार : हीना गावित व गोपाळ पाडवी यांच्यात सरळ लढत होत आहे.
जळगाव : स्मिता वाघ व करण पवार यांच्यात सरळ लढत होत आहे.
रावेर : रक्षा खडसे व श्रीराम पाटील यांच्यात लढत होत आहे.
जालना : रावसाहेब दानवे व कल्याण काळे यांच्यात लढत होत आहे.

