सोमवार, दि. १३ मे
सोमवारी राज्यात अकरा लोकसभा मतदारसंघात चौथ्या टप्प्याचे मतदान पार पडले. यात प्रामुख्याने अहमदनगरमध्ये ६१% तर शिर्डीमध्ये ६२% टक्के सरासरी मतदान झाल्याची माहिती अहमदनगरचे जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ व शिर्डीचे अपर जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी बाळासाहेब कोळेकर यांनी दिली आहे.
लोकसभा सार्वत्रिक निवडणुकी दरम्यान अहमदनगर येथे किरकोळ वादातून राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला. शेवगाव तालुक्यातील भातकुडगाव येथे मतदाराने ईव्हीएमवरील मतदानाचे चित्रीकरण केल्याने संबंधितावर गुन्हा दाखल करण्यात आला तर राहाता तालुक्यातील कोल्हार येथे निळया रंगाच्या शाईची बाटली घेऊन अवैधरित्या शाई लावणाऱ्या व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
निवडणुकी दरम्यान अशा किरकोळ घटना वगळता अहमदनगर जिल्ह्यात लोकसभा निवडणुकीसाठीचे मतदान शांततेत पार पडले असल्याची माहितीही जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी सालीमठ यांनी दिली.
दरम्यान अहमदनगर लोकसभा मतदारसंघात भाजपचे विद्यमान खासदार डॉ. सुजय विखे आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरचंद्र पवार गटाचे आमदार निलेश लंके यांच्या सरळ लढत झाली आहे. राज्यातील अटीतटीची लढत म्हणून या लढतीकडे पाहिले जात आहे.
याशिवाय शिर्डी लोकसभा मतदारसंघात शिवसेना शिंदे गट विद्यमान खासदार सदाशिव लोखंडे, महाविकास आघाडीचे माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे आणि वंचित बहुजन आघाडीच्या उत्कर्षा रुपवते यांच्या तिरंगी लढत झाली. शिर्डी आणि अहमदनगर मधील या पाच प्रमुख उमेदवारांसह अन्य उमेदवारांचे भवितव्य मतदान यंत्रात बंद झाले असून मतदारांनी आपला खासदार म्हणून कोणाला कौल दिला हे ४ जूनला मतमोजणीनंतर समजणार आहे.


