सोमवार, दि. २० मे
कत्तल करण्याच्या उद्देशाने निर्दयतेने विना अन्न पाण्यावाचून एका पीकअपमध्ये नेल्या जात असलेल्या १८ गोवंश जनावरांची संगमनेर पोलिसांनी सुटका केली आहे. पोलीस उपअधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांच्या आदेशावरून करण्यात आलेल्या या कारवाईत पोलिसांनी जिवंत जनावरांसह सुमारे साडेपाच लाख रुपयांचा मुद्देमाल ताब्यात घेतला आहे.
सोमवारी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास शहरातील कोल्हेवाडी रस्त्यावर ही कारवाई करण्यात आली. एका पीकअपमध्ये कत्तलीसाठी जिवंत गोवंश जनावरे आणली असल्याची माहिती संगमनेरचे पोलीस उपाधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांना मिळाली होती. त्यांनी तातडीने यासंदर्भात आपल्या कार्यालयातील पोलीस कर्मचारी राहुल सारबंदे आणि राहुल डोके यांना घटनास्थळी जाण्याचे आदेश दिले.
घटनास्थळी गेलेल्या पोलीस पथकाने संशयित पीकअप (एम. एच. १२ एफ. डी. २४५६) अडवून तिची तपासणी केली असता परवेज आरिफ सय्यद (वय २५ वर्ष रा. मदिनानगर, संगमनेर) हा पिकअपमध्ये जिवंत गोवंश जनावरांना निर्दयतेने, दाटीवाटीने डांबून वाहतूक करताना आढळून आला. तपासणीअंती कत्तल करण्याच्या उद्देशाने १८ गोवंश जातीच्या जनावरांची वाहतूक करताना आढळून आला. त्यामुळे पोलिसांनी त्याला ताब्यात घेत जनावरांची सुटका केली.
पोलीस कॉन्स्टेबल राहुल सारबंदे यांनी शहर पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून परवेज आरिफ सय्यद (वय २५ वर्ष रा. मदिनानगर, संगमनेर) याच्या विरोधात प्राण्यांना निर्दयतेने वागणूक अधिनियम कायदा कलम (३)(११) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास संगमनेर पोलीस करत आहे.


