- मौलानासोबत मुलीचा विवाह करून देण्यास पित्याने दिला होता नकार
- साथीदारांच्या मदतीने खून करत मौलानाने घेतला बदला
- अकस्मात मृत्यू म्हणून नोंदल्या गेलेल्या प्रकरणाची महिनाभरात पोलिसांनी केली उकल
सोमवार, दि. २७ मे
गेल्या महिन्यात संगमनेर तालुक्यातील मालदाड गावच्या शिवारात असलेल्या जंगलामध्ये मृतावस्थेत सापडलेल्या व्यक्तीची ओळख पटविल्यानंतर पोलीस दप्तरी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली होती. मात्र हा मृत्यू अकस्मात नसून संबंधित व्यक्तीचा घातपात झाल्याचे समोर आले असून याप्रकरणी संगमनेर पोलिसांनी उत्तर प्रदेश मधून मौलानासह त्याला मदत करणाऱ्या दोघांपैकी एकाला अटक केली आहे.
याप्रकरणी संगमनेर शहर पोलीस ठाण्यात मृत व्यक्तीचा मुलगा जुनेद आहातेशाम अन्सारी याने दिलेल्या फिर्यादीवरून आहतेशाम इलियास अन्सारी यांचा खून केल्याप्रकरणी मौलाना मोहम्मद जाहिद मोहम्मद युनूस मुलतानी (रा. सहारनपुर, उत्तर प्रदेश) याच्यासह त्याला मदत करणाऱ्या मोहम्मद इमरान निसार सिद्धकी (रा. कल्याण) व मोहम्मद फैजान शमीम अन्सारी (रा. बगदाद अन्सार, ता. धामपूर जि. बिजनोर या तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यापैकी दोघांना अटक करण्यात आली असून एक जण फरार आहे.
चंदा मागण्यासाठी उत्तर प्रदेशच्या सहारनपुर येथून संगमनेरात आलेल्या मौलानाला घरी आश्रय दिल्याने झालेल्या परिचयातून मौलानाने आश्रय देणाऱ्या घर मालकाच्या मुलीलाच थेट लग्नाची मागणी घातली. मौलाना बाहेरच्या राज्यातील असून त्याचा निश्चित ठाव ठिकाण नसल्याने आहतेशाम इलियास अन्सारी यांनी मुलीचा विवाह मौलाना सोबत करून देण्यास नकार दिला होता. त्यामुळे मौलाना मोहम्मद जाहिद याने “तुमने ऐसे तरीकेसे लडकी नही दी, तो मुझे दुसरा तरीका भी आता है! मै तुमको बरबाद कर डालुंगा” अशी धमकी दिली होती. त्यानंतर आहतेशाम इलियास अन्सारी यांनी मौलानाला घराबाहेर काढून दिले होते.
तेथून मौलानाने देवठाण (ता. अकोले) येथे सुमारे दीड महिना त्यानंतर कल्याण येथे मौलाना म्हणून काम सुरू केले. ओळखीमुळे वडील काही अडचण आल्यास मौलानाला फोन करून माहिती विचारत. तसेच वडिलांना मौलाना अधून मधून कल्याण येथे बोलावून घेत असे. यादरम्यान देखील मौलाना अन्सारी यांच्याकडे मुलीच्या विवाहासंबंधी (तक्रारदाराची बहीण) बोलत असे. परंतु मौलाना फिरून वेगवेगळ्या मज्जिद मध्ये राहत असल्याने मुलीच्या भविष्याचा विचार करून तिच्या मौलाना सोबतच्या विवाह नकार दिलेला होता. त्यानंतर १ एप्रिल ला रात्री साडेअकरा वाजण्याच्या सुमारास तक्रारदाराचे वडील आहतेशाम इलियास अन्सारी हे घरून दोन लोकांचा डबा घेऊन बाहेर पडले होते डबा कोणासाठी चालवला याबद्दल त्यांनी घरी काही एक सांगितले नाही. त्यानंतर दुसऱ्या दिवशी ते सकाळी घरी परत आले. ३ एप्रिलला ते पुन्हा सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास घरात कोणाला काही एक न सांगता दुचाकी घेऊन बाहेर पडले होते.
वडील घरी परत न आल्याने तसेच त्यांचा मोबाईल फोन बंद लागत असल्याने आसपास नातेवाईकांकडे चौकशी केली असता ते मिळून आले नाही म्हणून संगमनेर शहर पोलीस ठाण्यात मिसिंगची तक्रार दाखल करण्यात आली होती.
दरम्यानच्या काळात घरातील लोक मौलानावर विश्वास असल्याने तसेच ते त्यांच्याकडे कल्याणला जात असल्याने फोन करून मौलानाने ३० मार्चला ते आपल्याकडे कल्याणला आले होते अशी माहिती दिली. मौलाना असल्याने त्यांना वडिलांबद्दल विचारणा केल्यास त्यांनी ते जिवंत असून सुरक्षित असल्याचे व नक्कीच गरीब परिस्थितीतील असे सांगितले होते. त्यांच्यावर विश्वास ठेवत घरच्यांनी त्यांना संगमनेर येथे बोलावले असता त्यांनी संगमनेरला येण्यास टाळाटाळ केली. त्यामुळे तक्रारदारांनी याची माहिती शहर पोलीस ठाण्यातील सहाय्यक फौजदार रावसाहेब लोखंडे यांना दिली.
लोखंडे यांनी फोन करून मौलानाला संगमनेरला बोलावून घेत त्यांच्याकडे चौकशी करत त्यांचा जबाब नोंदवून घेतला होता.
दरम्यान सगळ्याच प्रकार संशयास्पद असल्याने पोलिसांनी उत्तर प्रदेश मधून मौलानाला अटक करून संगमनेर आणले. त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने आपल्या दोघा साथीदारांच्या मदतीने दोरीच्या सहाय्याने गळा आवळून आहतेशाम इलियास अन्सारी यांचा खून केल्याची कबुली दिली.

