गुरुवार, दि. ३० मे
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या कृतीतून अडचणीत सापडले असतानाच “मला फाशी दिली तरी चालेल, पण मी मनुस्मृती आणि मनुवादाच्या विरोधात उभा राहणार आहे”, अशा स्पष्ट शब्दात जितेंद्र आव्हाड यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे.
मनुस्मृती दहन करत असतानाच आमदार जितेंद्र आव्हाड यांच्याकडून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो असलेलं पोस्टर फाडलं गेलं. याप्रकरणी जितेंद्र आव्हाड यांनी माफी मागितली, मात्र तरीदेखील सत्ताधारी पक्षाकडून याप्रकरणी रान उठवलं गेलं. सत्ताधाऱ्यांनी ठिकठिकाणी आंदोलनं करून अनेक पातळीवर आव्हाडांचा विरोध सुरू ठेवला आहे.
या पार्श्वभूमीवर जितेंद्र आव्हाड यांनी आपली भूमिका स्पष्ट केली असून ते म्हणाले की, मी काल महाडला गेल्यावर मला खरा इतिहास कळला. ज्या कुटुंबानी बाबासाहेब आंबेडकरांना पाठींबा दिला होता, तेव्हा सनातन्यांनी त्यांच्या घरांवर १० वर्षे बहिष्कार घातला. बाबासाहेब जेव्हा रायगडावर गेले तेव्हा तिथल्या सनातन्यांनी त्यांना मारण्याचा प्रयत्न केला. तिथे याचे साक्षीदार आहेत. यानंतर आता मनुस्मृती जाळणार हे कळल्यावर सनातन्यांनी दम देत जागा देऊ नका असे धमकावले.
जागा देणाऱ्या मुस्लिम व्यक्तीलाही त्यांनी विरोध केला. ९७ वर्षांनी त्याच जागी मनुस्मृती जाळली गेली. त्यावेळी आमच्याकडून चूक झाली आणि गुन्हा दाखल झाला आहे. त्यामुळे आता मला फाशी द्या, पण मी मनुस्मृती आणि मनुवादाच्या विरोधात उभा राहणार आहे. स्त्री द्वेषाची बिजे रोवणाऱ्या मनुस्मृतीस माझा विरोध असणार आहे. मनुस्मृतीमध्ये स्त्री कोणत्याही जाती-वर्णाची असो, ती अत्यंत खालची आहे, त्यामुळे तिचा वापर उपभोगाची वस्तू म्हणून वापरा, असं म्हणणारा मनु मला मान्य नाही.
मला आई आहे आणि माझ्या आईला असं म्हणणं मला मान्य नाही. मराठी साहित्यात म्हटल्याप्रमाणे एका क्षणाची पत्नी अनंत काळाची माता असते. त्या मातेबद्दल लिहिणं कुठल्या माणसाला मान्य आहे? माझ्या हातून चूक झाली, त्याबद्दल मी बोलायचं ते बोललो. आंबेडकरांवर प्रेम करणाऱ्या सर्व स्तरातील माणसांची मी माफी मागितली आहे.
भाजपा हा माझा वैचारिक शत्रू आहे. त्यांच्यात आणि माझ्यात मनुस्मृती, जातीपातीच्या राजकारणामुळे, धर्माच्या राजकारणामुळे वैचारिक मतभेद आहेत. शरद पवार यांची जी भूमिका आहे, तीच माझी भूमिका आहे आणि आयुष्यभर तीच माझी भूमिका राहिलं. राहिला प्रश्न मनुस्मृती वादाचा, तर मनुस्मृतीमध्ये शुद्राचं निर्माण झालं आहे.
कोश्यारी यांनी महात्मा फुले यांच्याबद्दल बोलल्यावर माफी मागितली होती का? चंद्रकांत पाटील यांनी शिवाजी महाराजांबद्दल बोलल्यावर माफी मागितली होती का? पण त्यांना बोलायला कोण भाजपावाले गेले नाहीत, असा हल्लाबोल जितेंद्र आव्हाड यांनी केला.


