सोमवार, दि. ३ जून
लोकसभा निवडणुकीचा निकाल जाहीर करीत असताना सर्वप्रथम पोस्टाने आलेल्या मतांची (पोस्टल बॅलेट्स) मोजणी केली जावी, अशी मागणी इंडिया आघाडीच्या नेत्यांनी रविवारी निवडणूक आयोगाकडे केली. आघाडीच्या एका शिष्टमंडळाने यासंदर्भात निवडणूक आयुक्तांची भेट घेतली.
मागील काही काळात आम्ही तिसऱ्यांदा निवडणूक आयोगात आलो आहोत. पोस्टल बॅलेट हे निकालात महत्वाची भूमिका बजावत असतात. पोस्टल बॅलेटची सर्वप्रथम मोजणी केली जावी, हा निवडणूक आयोगाचा नियम आहे. त्यामुळे चार तारखेला निकालादरम्यान या मतांची आधी मोजणी केली जावी, अशी मागणी करण्यात आली असल्याचे कॉंग्रेसचे नेते अभिषेक मनू सिंघवी यांनी निवडणूक आयोगाला दिलेल्या भेटीनंतर पत्रकारांशी बोलताना सांगितले.
पोस्टल बॅलेटची आधी मोजणी करण्याचा मुद्दा आयोगाने त्यांच्या नियमातून हटवला आहे. यामुळे ईव्हीएम मशिनमधील मतांची मोजणी झाल्यानंतर देखील पोस्टल बॅलेटची मोजणी करणे अनिवार्य राहिलेले नाही, असा दावा सिंघवी यांनी केला. कडक देखरेखीखाली मतमोजणी केली जावी, असा मुद्दा आयोगासमोर मांडण्यात आला असल्याचे कॉंग्रेसचे नेते सलमान खुर्शीद यांना यावेळी नमूद केले.
व्हीव्हीपॅट स्लिपसची शंभर टक्के जुळवणी करण्याची विनंती देखील शिष्टमंडळाकडून आयोगाला करण्यात आली असल्याचे सूत्रांनी सांगितले. आयोगाला भेटलेल्या शिष्टमंडळात भाकपचे डी. राजा, माकपचे सीताराम येचुरी, सपाचे रामगोपाल यादव, संजय यादव, नासिर हुसेन आदी नेत्यांचा समावेश होता.


