विशेष लेख
★★★★★★★★★★★ ★★★★★★★★★★★
तो उगवतो आणि अंधाराला हटवतो.
उगवताना सौम्य, दुपारी प्रखर तेजाने,
जगाला लख्ख करून टाकतो,
तो एक सूर्य ह्या जगती असतो.
असाच एक क्रांतिसूर्य,
त्याचे जन्मामुळे आणि कार्य कर्तृत्वामुळे
दुःखाचा अंधार बाजुला सारून
सुखाचा प्रकाश दारात आला.
अनाथाचे “नाथ ” बनून,
दीनदुबळ्यांचा उत्कर्ष केला.
महान नेत्यांचे कार्याची आठवण म्हणून कार्यकर्तृत्वाचा थोडक्यात घेतलेला आढावा.
गोपीनाथ मुंडे साहेबांचा जन्म नाथ्रा गावी परळी तालुक्यात बीड जिल्ह्यात १२ डिसेंबर १९४९ साली पांडूरंग मुंडे आणी लिंम्बाबाई मुंडे या वारकरी आणि अध्यात्मावर प्रेम असणाऱ्या दांपत्याच्या पोटी झाला. पदवीपर्यंत शिक्षण त्यांनी अंबेजोगाई येथे घेतले. साहेबांनी पुढे कायद्याचे शिक्षण पुणे येथे घेतले. महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना प्रमोद महाजन साहेबांची भेट व मैत्री होऊन साहेबांच्या आयुष्याला कलाटणी मिळाली. भारतीय विद्यार्थी परिषदेच्या माध्यमातून संघाच्या संपर्कात आले. त्यातून महाराष्ट्रात काम करण्याची मोठी जबाबदारी मिळाली. १९७५ साली आणीबाणीबाबत इंदिरा गांधी सरकारविरूध्द आवाज उठल्याने नाशिक येथिल कारागृहात साेळा महीने तुरुंगवास भोगावा लागला. तेथून सुटल्यानंतर त्यांनी बीड जिल्हा परिषदेची निवडणुक १९७८ मध्ये लढून राजकीय कारकीर्दीचा श्रीगणेशा केला.
त्याचवर्षी त्यांचा विवाह प्रमोद महाजन यांच्या भगिनी प्रज्ञा महाजन यांच्याशी झाला. पुढे त्यांना पंकजा, प्रितम व यशश्री ही तीन अपत्ये झाली. सन १९८० साली प्रथमतः त्यांची रेणापूर मतदार संघातून विधानसभेत आमदार म्हणून निवड झाली. त्याच मतदार संघाचे १९९० आणि १९९५ साली पुन्हा प्रतिनिधीत्व त्यांनी केले. आपल्या नेतृत्वाची चुणूक विधानसभेत त्यांनी दाखवून दिली, गोरगरीब, जनसामान्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी विरोधी पक्षात बसून सत्तेचा मोह बाजूला सारून शेतकरी, कामगार, दीन दलित, भटक्या विमुक्तांच्या प्रश्नाची सोडवणूक करून न्याय मिळवून दिला. उपेक्षित लोकांचे प्रश्न धडाडीने मांडण्यात ते यशस्वी झाले. नेतृत्वाचे जोरावर त्यांनी भारतीय युवा मोर्चाचे अध्यक्ष, त्यांनतर प्रदेशाध्यक्ष, उपमुख्यमंत्री, संसदीय उपगट नेता आणि २०१४ साली केंद्रीय ग्रामविकासमंत्री अशी अनेक पदे मिळवली.
साहेबांची खरी कारकीर्द गाजली ती १९९० नंतरच्या काळात. त्यांनी विरोधी पक्षनेता पद काय असते, हॆ जनतेचे प्रश्न मांडत असतांना आपल्या कामातून शरद पवारांसारख्या नेतृत्वाला जेरीस आणले. साहेबांनी शेतकऱ्याचे प्रश्न, राजकीय गुन्हेगारीकरण गोवारी हत्याकांडाबाबत तत्कालीन सरकारला धारेवर धरले. गृहमंत्री झाल्यानंतर शेकडो गुन्हेगाराचे एन्काऊंटर करून अंडरवर्डचे जाळे नष्ट करून खंडणी मागणाऱ्या टोळ्या संपून मुंबई शहराला गुन्हेगारी मुक्तीकडे नेले.
स्पष्टवक्तेपणा, प्रशासनावरील पकड ह्यामुळे अनेक प्रश्न त्यांनी धसास लावले. महाराष्ट्रात संघर्ष यात्राद्वारे राजकीय गुन्हेगारीकरण, मुंबई बॉम्बस्फोट, शेतकऱ्याचे प्रश्न हया मुद्यावर त्यांनी महाराष्ट्र ढवळून काढला. आणि शिवसेनेच्या सहाय्याने युतीचे सरकार राज्यात स्थापन केले. या सरकारमध्ये साहेब उपमुख्यमंत्री, गृहमंत्री आणि ऊर्जामंत्री होते. शेतकरी, ऊसतोड कामगाराचे प्रश्न, ओबीसी जातीच्या मुलांना स्कॉलरशिप ,ओबीसी समाजाला न्याय देणारे सामान्य माणसाचे असामान्य नेतृत्व होते.
आजच्या नेत्याप्रमाणे समाज माध्यमांमध्ये जाहिरातीसाठी पगारी माणसे ठेऊन “लोकनेता” घडत नसतो, तर मातीतील माणसाशी माणुसकीची नाळ असणारा माणूस स्व-कर्तृत्वाने “लोकनेता” घडतो, हे मुंडे साहेबानी समाजाला मोठे उदाहरण निर्माण करून दिले. गरीब शेतकऱ्यांच्या पोटी जन्म घेऊन आपण नुसते दुसऱ्याच्या बांधावर ऊसतोड करायची नाही तर अनेक साखर कारखाने उभे करून त्याचा उत्कृष्ट कारभार करून कारखानदार बनण्याचा आदर्श समाजात निर्माण केला . घरात राजकारणाचा ‘र’ माहीत नसताना केंद्रीय ग्रामविकास मंत्रीपद मिळवणे हे सोपे काम नव्हते ते फक्त साहेबानी अफाट कष्ट, तुफान संघर्ष, अपार दूरदृष्टीच्या जोरावर साध्य करून दाखवले.
आज कुरघोडीच्या राजकारणात “नेत्याला कार्यकर्ता” बनवणारे नेते कोठे? आणि “कार्यकर्त्याला नेता” बनविणारे मुंडे साहेब कोठे, त्यामुळे कार्यकर्त्याला न्याय देणारा असा लोकनेता महाराष्ट्रात पुन्हा होणार नाही. साहेब धुरंधर नेते आणि प्रभावी अमोघ वक्ते होते. महाराष्ट्रात भाजपाची ओळख बहुजन समाजाचा पक्ष म्हणून निर्माण करून देणारे ते एक योद्धा होते. महाराष्ट्रात पक्षाला सत्तेच्या गादीवर बसवणारे एकमेव योद्धा होते.
जनसामान्यांचे प्रश्न सोडवून लाखोची गर्दी जमावणारा दर्दी लोकनेता, २०१४ मध्ये लोकसभा निवडणूक जिंकून साहेबांनी केंद्रात ग्रामविकास मंत्रीपदाची शपथ घेतली, जागोजागी सत्कार, हार तुरे आणि पुष्पवर्षाव होत होता. पण हा आनंद नियतीला मान्य नव्हता. ३ जुनच्या पहाटेच साहेबांवर काळाने घाला घातला. साहेबाचे अपघातात निधन झाले. “उगवणारा सूर्य कधीतरी अस्तास जातो ” तसेच साहेब आपल्यातून निघून गेले. साहेबांच्या निधनाने लाखो कार्यकर्ते, त्यांना मानणारे तळागाळातील बहुजन समाजातील लोक एका महान संघर्षमय नेतृत्वाला पोरके झाले.
अश्या या फाटक्या कपड्यातील माणसाला पद आणि प्रतिष्ठा, तसेच राजकारणात अस्पृश्य, वंचित, अनाथ पीडितांना मदतीचा हात देऊन “नाथ” बनवणाऱ्या महान युगप्रवर्तकाच्या पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन.
अँड. गोरक्ष कापकर, संगमनेर.
मो. नं. ९९२१३८६९८४


