गुरुवार दिनांक ६ जून २०२४
केंद्रात सरकार बनविण्याइतपत साधे बहुमतही भारतीय जनता पक्षाला यावेळी मिळाले नाही. २४० वरच त्यांचा आत्मा लटकताना दिसत आहे. तरीही नरेंद्र मोदी यांनी बहुमत दिल्याबद्दल जनतेचे आभार मानले, मोदी हे आता त्यांच्या ‘ब्रॅण्ड’चे म्हणजे मोदी सरकार बनवत नाहीत तर, त्यांनी ‘रालोआ’चे सरकार बनवत असल्याचे जाहीर करून स्वतःचा पराभव मान्य केला, असे सांगत ठाकरे गटाने मोदी यांच्यावर निशाणा साधला आहे.
अग्रलेखातून टीका – नरेंद्र मोदी आणि त्यांच्या भाजपाचा पुरता पचका लोकसभा निवडणुकांच्या निकालात झाला आहे. जनतेने त्यांना जवळ जवळ सत्तेवरून खाली खेचले आहे. ही खेचाखेची करताना जनतेने सभ्यता आणि संस्कृतीचे दर्शन घडवले. त्याचा गैरफायदा मोदी घेत आहेत, असा आरोप शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने सामना दैनिकातील अग्रलेखाच्या माध्यमातून केला आहे.
असे असेल व्यंगचित्र – ‘मोदी सरकार’, ‘मोदी गॅरंटी’, ‘मोदी है तो मुमकीन है’, ‘मोदी तो भगवान है,’ अशा फेकू कल्पनांना निवडणूक निकालांनी केराची टोपली दाखवली. मोदी यांनी सरकार बनवलेच तर त्यांचे चित्र हे एक व्यंगचित्र असेल. संपूर्ण शरीरभर फॅक्चर आणि प्लॅस्टर लपेटलेले मोदी हे नितीश कुमार आणि चंद्राबाबू नायडू यांच्या कुबड्या घेऊन चालत आहेत. त्या कुबड्यांच्या आधारेच त्यांना सरकार चालवावे लागेल. या कुबड्याही अखेरपर्यंत साथ देतील काय याची गॅरंटी नाही, अशी खोचक टीकाही ठाकरे गटाने या अग्रलेखाद्वारे केली आहे.
निकालाने जमिनीवर आणले – लोकसभा निकालांनी मोदी यांना जमिनीवर आणले आणि त्यांनी सांगितले की, ‘माझ्या आईच्या मृत्यूनंतरची ही माझी पहिली निवडणूक आहे.’ चला, अखेर मोदी यांनी मान्य केले की, ते आकाशातील झग्यातून पडले नाहीत, तर त्यांचाही जन्म इतर मर्त्य मानवांप्रमाणे आईच्या कुशीतूनच झाला. मोदी यांना हे असे बोलण्याशिवाय पर्याय नाही. कारण त्यांच्या देवत्वाचा, अवतारगिरीचा आणि बाबागिरीचा मुखवटा खुद्द काशी नगरीतच जनतेने ओरबाडून काढला आहे, असा घणाघात ठाकरे गटाने केला आहे.


