गुरुवार, दिनांक ६ जून २०२४
येत्या दोन-तीन दिवसात नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली एनडीएचे (NDA) सरकार स्थापन होण्याचे शक्यता वर्तवली जात आहे. या पार्श्वभूमीवर शेअर मार्केट मधील मोठा घोटाळा बाहेर आला आहे. शेअर मार्केटमध्ये देशातील सर्वात मोठा घोटाळा भाजपाने केल्याचा आरोप करत त्याची संयुक्त संसदीय समितीमार्फत चौकशी करण्याची मागणी काँग्रेस नेते, खासदार राहुल गांधी यांनी केली आहे.
लोकसभा निवडणुकीच्या आधी विविध संस्थांचे एक्झिट पोल समोर आले होते. या सर्व एक्झिट पोलमध्ये भाजपला ३०० च्या आसपास जागा दाखविण्यात आल्या होत्या. त्यामुळे शेअर मार्केटमध्ये अचानक मोठ्या प्रमाणावर उसळी पाहायला मिळाली होती. मात्र, ४ जूनला निवडणुकीच्या निकालाच्या दिवशी शेअर मार्केट अचानक कोसळले होते. त्यामुळे अनेक गुंतवणूकदारांना मोठा फटका बसला. यावरून राहुल गांधींनी भाजपाला घेरले आहे.
गुरुवारी सायंकाळी पत्रकार परिषद घेत काँग्रेस नेते राहुल गांधींनी “शेअर मार्केटमध्ये निकालाच्या दिवशी सर्वात मोठा घोटाळा झाला आहे”, असे म्हणत या घोटाळ्याशी संबंधित तीन मुद्दे उपस्थित केले आहे.
- नरेंद्र मोदी, अमित शहा आणि निर्मला सीतारामण यांच्यावर गंभीर आरोप केले. ते म्हणाले, नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांनी शेअर बाजारात गुंतवणूक करणाऱ्या पाच कोटी कुटुंबांना विशिष्ट गुंतवणुकीचा सल्ला का दिला? गुंतवणुकीचा सल्ला देणे हे त्यांचे काम आहे का?
- दोघांच्या मुलाखती एकाच मीडियाला का दिल्या गेल्या? हाच उद्योग समूह जो स्टॉकमध्ये फेरफार केल्याप्रकरणी सेबीच्या चौकशीत आहे.
- बनावट एक्झिट पोलर्स आणि एक्झिट पोल जाहीर होण्याच्या एक दिवस अगोदर गुंतवणूक करणाऱ्या संशयास्पद विदेशी गुंतवणूकदारांचा काय संबंध आहे? त्यामुळे याची चौकशी करण्यासाठी आम्ही आज संयुक्त संसदीय समितीची मागणी करतो, असे राहुल गांधींनी म्हटले.
ते पुढे म्हणाले, “संपूर्ण भारत या मागचे सत्य जाणून घेऊ इच्छित आहे. खोट्या एक्झिट पोलचा शेअर मार्केटवर परिमाण झाला. नरेंद्र मोदी, अमित शाह, निर्मला सितारामण यांनी शेअर मार्केटवर टिप्पणी केल्यामुळे आधी मार्केट वरती गेलं आणि ४ जून रोजी मार्केट खाली आलं. यामध्ये ४ तारखेला तब्बल ३० लाख कोटी रूपयांचे नुकसान झाले”, असा मोठा दावा राहुल गांधी यांनी केला.


