विशेष प्रतिनिधी / मुंबई
प्रतिष्ठा पणाला लागलेल्या बीड लोकसभा निवणुकीच्या मतदानात महायुतीचे नेते धनंजय मुंडे आणि सुरेश धस यांनी केलेल्या मदतीमुळे आपल्याला यश मिळू शकले, या विजयी उमेदवार बजरंग सोनावणे यांच्या दाव्याने एकच खळबळ उडवून दिली आहे. शरद पवार गटाचे उमेदवार बजरंग सोनवणे यांनी भाजप उमेदवार पंकजा मुंडे यांचा पराभव केला आहे. हा पराभव भाजपच्या चांगलाच जिव्हारी लागल्याचं दिसतंय. अशात बजरंग सोनवणे यांच्या गौप्यस्फोटाने एकच खळबळ उडवून दिली आहे.
माझ्या विजयामध्ये बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे आणि आमदार सुरेश धस यांचा वाटा आहे, असं बजरंग सोनवणे यांनी म्हटलं आहे. आमचे नेते शरद पवार यांच्या कुशल नेतृत्वाने माझ्या विजयाची मुहूर्तमेढ रोवली. माझ्या विजयाचं श्रेय बीड जिल्ह्याच्या जनतेला आहेच पण धनंजय मुंडे आणि सुरेश धस यांनीही दिल्या शब्दप्रमाणे मदत केली, असं सोनावणे म्हणाले. जिल्ह्यातील २ माणसांच मी आभार मानणार आहे. बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांचा माझ्या विजयामध्ये वाटा आहे. तर आदरणीय सुरेश धस यांचा वाटा देखील आहे, असं वक्तव्य बजरंग सोनवणे यांनी केलं आहे. ते बीडच्या केज येथे बोलत होते. बजरंग सोनवणेंच्या वक्तव्यामुळे अनेक तर्क-वितर्क लावले जात आहेत.
दुसरीकडे बीडचे खासदार बजरंग सोनावणे यांनी अजित पवारांना फोन केला आहे. या दोघांमध्ये फोनवर चर्चा झाल्याचा गौप्यस्फोट अमोल मिटकरींनी केला आहे. अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनीही बजरंग सोनावणे यांचा अजितदादांना फोन आल्याचं म्हटलंय. बीडमधील एका बप्पांचा फोन अजितदादांना आला, मला वाचवा अशी विनंती त्यांनी केली. अजितदादांचा सगळ्यांना सोबत घेऊन जायचा स्वभाव आहे, त्यामुळे काही दिवसात ट्रेलर दिसेल, असं सूचक विधान अमोल मिटकरींनी केलं आहे.
लोकांना विकासकामं करायची असली तर जिंकून आल्यावर अजित पवारांची गरज लागते, साखर कारखान्यासंदर्भात विषय असल्याने त्यांचा फोन आल्याची शक्यता असल्याचं अमोल मिटकरी म्हणाले.



