शुक्रवार, दिनांक १४ जून २०२४
नगर अर्बन बँक आर्थिक घोटाळा प्रकरणी अहमदनगरच्या जिल्हा व सत्र न्यायालयाने गुरुवारी पाच कर्जदार आरोपींचे जामीन अर्ज फेटाळून लावले आहे. यात संगमनेरमधील तिघा जणांचा समावेश आहे.
नगर पोलिसांनी यापूर्वी अटक केलेल्या व उच्च न्यायालयाने तात्पुरत्या स्वरूपात तीन महिन्यांच्या कालावधीसाठी जामीन मंजूर केलेल्या अमित पंडित याची पत्नी सपना पंडित, मुलगा सात्विक पंडित, भागीदार सत्येंद्र रावत यांच्यासह संजय सारडा व सुशील सारडा यांच्या जामीन अर्जावर विशेष न्यायालयाचे न्यायाधीश पी. आर. सित्रे यांच्यासमोर सुनावणी पार पडली होती. या संदर्भात न्यायाधीश सित्रे यांनी गुरुवारी (१३ जून) निर्णय देत पाचही आरोपींचे जामीन अर्ज फेटाळून लावले.
ठेवीदार व तपास अधिकाऱ्यांसाठी ही दिलासादायक बाब असली तरी नगरच्या न्यायालयाने जामीन अर्ज फेटाळलेले सर्व कर्जदार आरोपी आता उच्च न्यायालयात जाण्याची शक्यता आहे.
गैरव्यवहार झालेल्या नगर अर्बन बँक घोटाळ्यात गोरगरीब जनतेचा पैसा अडकलेला आहे. त्यामुळे घोटाळ्यात सहभागी कोणालाच दयामाया दाखवायचे नाही, ही आदर्श भूमिका घेत अहमदनगर जिल्हा एमपीआयडी विशेष न्यायालयाचे न्यायाधीश पी. आर. सित्रे यांनी पाचही कर्जदार आरोपींच्या जामीन अर्ज फेटाळले आहे. गोरगरीब ठेविदारांचा पैसा परत मिळावा यासाठी न्यायाधीशांनी आग्रही निरीक्षण नोंदविले. यामुळे ठेवीदारांना मोठा आधार निर्माण झाला. बँकेच्या उर्वरित कर्जदारांसाठी हा एक इशारा आहे. न्यायालयात सरकार पक्षाचे वकील, ठेवीदारांचे वकील व बँक बचाव समिति सदस्य अँड. अच्युत पिंगळे यांनी देखील ठेवीदारांची बाजू भक्कमपणे मांडली आहे व अनेक ठेवीदार न्यायालयात समक्ष हजर राहून चिकाटीने पाठपूरावा करत आहेत बँक बचाव समिति ठेवीदारांचे बाजूने खंबीरपणे उभी असल्याचे या खटल्यातील फिर्यादी व बँक बचाव समितीचे राजेंद्र गांधी यांनी म्हटले आहे.



