शनिवार, दिनांक १५ जून २०२४
पीडब्ल्यूडीचे अधिकारी, चार जेसीबी, चार ट्रॅक्टर, नगरपालिकेचे चीफ ऑफिसर त्यांचा सर्व स्टाफ संगमनेर शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक आणि त्यांचा पुरुष व महिला पोलीस स्टाफ, पोलीस व्हॅन हा सर्व लवाजमा अकोले नाका येथे सुमारे चार महिन्यांपूर्वी कोणाच्या तरी सांगण्यावरून पूर्व नियोजन करून आला. म्हाळुंगी नदीच्या गाळपेर क्षेत्रात १९७५ पासून अनेक घरे, वस्ती करून राहतात. कोणी वेल्डिंग काम करतात, महिला धुण्या-भांड्याचे, कोणी गवंडीकाम तर कोणी भंगार गोळा करण्याचे काम करतात. सर्व सामान्य हातावरची माणसं.
सरकारी यंत्रणा आल्यावर त्यांनी घरे पाडण्यास सुरुवात केली. आडवे आलेल्या लोकांवर पोलिसांनी लाठीचार्ज केला. सरकारी यंत्रणेपुढे भयभीत होऊन शांत बसलेले लोक, चेहऱ्यावर वेदना होत्या, घर पडल्यावर कुटुंब उघड्यावर पडणार, घरामध्ये लहान मुले, वयस्कर माणसे, काही बाळंतीन स्त्रिया अशा परिस्थितीत कुठे जाणार. हतबल होऊन सर्व नागरिक शांतपणे जेसीबीकडे पाहत होते.
त्यावेळेस एक पत्रकार शानू बेगमपुरे याचा अॅड. संग्राम जोंधळे यांना फोन गेला. फोनवर त्यांनी सांगितले की राजापूर रोड, अकोले नाका येथे घरे पाडण्याचे काम चाललेले आहे. माझ्या डोळ्यासमोर फक्त तुमचे नाव आले आहे. तुम्हीच हे थांबवू शकता तरी तुम्ही तातडीने आले तर बरं होईल. ही मोहीम थांबवा. त्यावेळेस अॅड. जोंधळे हे आजारी होते. ताप आलेला होता. कोर्टातदेखील गेले नाही. घरीच औषधाची गोळी घेऊन पडलेले होते. परंतु असा फोन आल्यावर आराम करण्यात काहीच अर्थ नाही. वेळ निघून गेल्यावर उपयोग नाही म्हणून त्याही परिस्थितीत ते त्या ठिकाणी गेले.
त्यावेळी बारा घरे पाडून झाली होती. सुमारे ५२ घरे शिल्लक होती. ते पाहिल्यावर अॅड. जोंधळे यांच्या लक्षात आले की कारवाई ही एकतर्फी बेकादेशीरपणे चाललेली आहे. कायद्याची पायमल्ली सरकारी यंत्रणेकडूनच होत आहे. परंतु तातडीने कोर्टात जाणे शक्य नाही. म्हणून तेथील लोकांना आवाज दिला, गोळा केले. एकत्रितपणे तुम्ही लढण्यास तयार आहात का? सर्वांनी एकमुखी हो म्हणून प्रतिसाद दिला.
त्यानंतर सर्व जमाव जेसीबीकडे गेला व जेसीबीला काढून दिले. त्यावेळेस पोलीस निरीक्षक मथुरे यांनी जोंधळे वकिलांना सांगितले की, तुम्हाला जेलमध्ये टाकेल. त्यावेळी अॅड. जोंधळे यांनी सांगितले की, सर्वात प्रथम मला जेलमध्ये टाका. कायद्याप्रमाणे कारवाई होत नसल्याचे प्रशासनाला निदर्शनास आणून दिले. तास दीड तास तणावात गेले. त्यानंतर सरकारी यंत्रणा निघून गेली. तो दिवस अत्यंत तणावात गेला.
त्यानंतर सर्व रहिवाशांना एकत्र करण्यात आले व ही परिस्थिती बदलली पाहिजे. त्यामध्ये संघर्ष सामाजिक संघटनेने मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला. कालांतराने या रहिवाशांची कागदपत्रे जमा करून मनाई हुकुमासाठी संगमनेर कोर्टात दावा करण्यात आला. मनाई हुकुमासाठीच्या अर्जाचा निकाल होऊन जिल्हाधिकारी, सार्वजनिक बांधकाम खाते, पोलीस खाते, तहसील इत्यादी विरुद्ध न्यायालयाने या रहिवाशांची घरे पाडू नये म्हणून मनाई करण्यात येत असल्याचा आदेश दिला.
अॅड संग्राम जोंधळे यांनी अत्यंत अडचणीच्या व कठीण प्रसंगात साथ व योग्य मार्गदर्शन दिल्यामुळे आज ५२ घरे त्या ठिकाणी आहेत. येथील रहिवाशांनी एकत्र येऊन पत्ता नसलेल्या या वसाहतीला “संग्राम नगर” हे नाव दिले व कृतज्ञता व्यक्त केली आहे.
या सर्व संघर्षात सागर ढगे, प्राजक्ता ढगे, निजाम रंगरेज, नर्गिस आत्तार, हिना आत्तार, महेंद्र राठोड, लक्ष्मी कतारी, अजय हासे, उमेश पाथरकर, विक्रम कतारी, इरफान पठाण, मुन्ना सय्यद, मीरा राखपसरे, लक्ष्मी भागवत याशिवाय असंख्य स्थानिक रहिवासी तसेच संघर्ष सामाजिक संघटनेचे शहराध्यक्ष दत्ता कांडेकर, मुख्य संघटक नागेशभैय्या रघुवंशी, जिल्हाध्यक्ष केशवराव जाधव, टपरीधारक संघटनेचे अरुण शेटे, धाकतोडे ताई यांनी सहभाग घेतला. आता येथील लोकांचे आरोग्य, स्वच्छता, आर्थिक बचत लहान मुलांचे शिक्षण या विषयावर संघर्ष सामाजिक संघटनेने लक्ष केंद्रित केलेले आहे.



