रविवार दिनांक 16 जून 2024
केंद्रात सरकार स्थापन करतेवेळी मोदींना पाठिंबा देताना तेलगू देसम पक्षाचे नेते चंद्रबाबू नायडू यांनी लोकसभेचे अध्यक्षपद मागितले होते. चंद्राबाबू नायडू यांनी लोकसभा अध्यक्षपदासाठी उमेदवार दिला तर त्याला आम्ही पाठिंबा देऊ तसेच संपूर्ण इंडिया आघाडीचा पाठिंबा देण्यासंदर्भात इंडिया आघाडीत चर्चा केली जाईल, अशी भूमिका शिवसेना ठाकरे गटाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी स्पष्ट केली.
नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीनंतर प्रथमत:च संसदेचे पहिले अधिवेशन सोमवारपासून (24 जून) सुरू होत आहे. या अधिवेशनात लोकसभेचा अध्यक्ष निवडला जाणार आहे. पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखाली देशात एनडीएचे सरकार स्थापन झाले आहे. त्यामुळे मोदींना पाठिंबा देताना तेलगू देसमचे नेते चंद्रबाबू नायडू यांनी लोकसभा अध्यक्षपदाची मागणी केली होती. मात्र भाजपकडून अध्यक्षपद नायडू यांच्या पक्षाला देण्यात येते की नाही, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

या पार्श्वभूमीवर राऊत यांनी रविवारी (दि. 16 जून) प्रसार माध्यमांशी बोलताना जाहीर केलेल्या भूमिकेमुळे भाजप अध्यक्षपदाचा काय निर्णय घेते याकडे लक्ष लागले आहे.
राऊत म्हणाले, लोकसभेचे अध्यक्षपद अत्यंत महत्वाचे आहे. राज्याच्या विधानसभेचे अध्यक्ष मिलिंद नार्वेकर यांनी भाजपाचे एजंट म्हणून काम केले होते. त्यांनी शिवसेनेबाबत ज्या पद्धतीने निकाल दिला आहे, ते पाहिल्यावर सर्व संशयास्पद आहे. शिवसेनेबाबत मिलिंद नार्वेकर यांनी बनावट निकाल दिला. राहुल नार्वेकर पॉलिटीकल एजंट आहे. तसाच निकाल उद्या लोकसभेत भाजपाचा अध्यक्ष झाल्यावर देण्यात येऊ शकतो.
तसेच, भाजपाकडे लोकसभा अध्यक्षपद गेल्यावर भाजपा सर्वात आधी चंद्रबाबू नायडू, नितीशकुमार यांचा पक्ष फोडतील. यामुळे चंद्राबाबू नायडू यांनी लोकसभेचे अध्यक्षपद मागितले असल्याचे आम्हाला समजले आहे. परंतु भाजपाचा अध्यक्ष झाल्यास चंद्रबाबू नायडू, नितीशकुमार, चिराग पासवान यांचा पक्ष फोडण्यात येईल. कारण भाजपाला ज्या ताटात खाल्ले आहे, त्या ताटात खड्डा खणायची सवय आहे. आम्हाला त्यांचा चांगला अनुभव आहे. म्हणून जर का लोकसभेचे अध्यक्षपद भाजपाकडे गेले, तर घटनाबाह्य पद्धतीने पक्ष फोडण्यात येऊ शकतात, असे राऊतांनी सांगितले.


