रविवार, दिनांक १६ जून २०२४
शनिवारी संगमनेर तालुक्यातील मेंढवन येथे तीन विद्यार्थिनींचा शेततळ्याच्या पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना अत्यंत दुर्दैवी असल्याचे स्पष्ट करत तालुक्याचे लोकप्रतिनिधी माजी मंत्री आमदार बाळासाहेब थोरात व युवक काँग्रेसचे अध्यक्ष, कॅन्सरतज्ञ डॉ. जयश्री थोरात यांनी रविवारी मृत विद्यार्थिनींच्या कुटुंबीयांची भेट घेत त्यांचे सांत्वन केले.
शनिवारी शालेय नवीन वर्षाला प्रारंभ झाला. सृष्टी उत्तम डापसे (इयत्ता सहावी, वय- १३ वर्ष), वैष्णवी अरुण जाधव (इयत्ता सहावी, वय १२ वर्ष) आणि अनुष्का सोमनाथ बडे (इयत्ता चौथी, वय १० वर्ष) या शालेय विद्यार्थिनींचा शाळेतून परतून येत असताना गावालगत असलेल्या शेततळ्यात बुडून त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला.
महाविकास आघाडीच्या बैठकीसाठी मुंबईत उपस्थित असलेल्या थोरात यांनी या घटनेचे वृत्त कळताच आपल्या यंत्रणेला तातडीने मदत करण्याच्या सूचना दिल्या होत्या. तर जयश्री थोरात यांनी देखील स्थानिक पदाधिकारी, ग्रामस्थांशी संपर्क करत तिन्ही कुटुंबीयांना धीर देण्याचा प्रयत्न केला.
तालुक्यात घडलेल्या या घटनेमुळे बाळासाहेब थोरात व जयश्री थोरात यांनी मेंढवन येथे जात डापसे ,जाधव व बडे कुटुंबीयांच्या भेटी घेऊन त्यांचे सांत्वन केले. यावेळी त्यांच्या समवेत कारखान्याचे चेअरमन बाबा ओहोळ, बाळासाहेब गायकवाड, शेतकी संघाचे संचालक विनायक काळे, संपत काळे, ज्ञानेश्वर काळे आदींसह गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

झालेली घटना ही अत्यंत दुर्दैवी आहे. शाळेचा पहिला दिवस हा आनंदाचा असतो. या चिमुकल्या विद्यार्थिनी अत्यंत आनंदाने हा पहिला दिवस साजरा करण्यासाठी गेल्या होत्या. मात्र दुर्दैवाने काळाने त्यांच्यावर घाला घातला. ही अकस्मात घटना असून यामुळे सर्वांना मोठे दुःख झाले आहे. शासकीय स्तरावरून या विद्यार्थिनींच्या कुटुंबीयांना जास्तीत जास्त मदत करण्यासाठीच्या सूचना संबंधितांना देण्यात आल्या आहे. – आमदार बाळासाहेब थोरात.


