विशेष प्रतिनिधी / मुंबई
महाराष्ट्र विधान परिषदेच्या ११ सदस्यांचा कार्यकाल २७ जुलै रोजी संपत असल्याकारणाने या जागांसाठी निवडणूक जाहीर करण्यात आली आहे. १२ जुलै रोजी मतदान होणार आहे. तर त्याचदिवशी सायंकाळी मतमोजणी पार पडणार आहे.
विधानसभेच्या आमदारांकडून विधान परिषदेच्या सदस्यांसाठी मतदान होणार असल्याने आणि हे मतदान गुप्त पद्धतीने होणार असल्याने सर्वच राजकीय पक्षात या निवडणुकीची चुरस रंगणार आहे. या ११ जणांमध्ये शेकापचे सरचिटणीस आमदार जयंत पाटील यांचाही समावेश आहे.
विधान परिषदेच्या ११ सदस्यांचा कार्यकाल २७ जुलै रोजी संपत असल्याने या जागांसाठी निवडणूक कधी लागते याकडे सर्वच राजकीय पक्षांचं लक्ष लागलं होतं.
विधानसभेतून निवडून द्यायच्या या जागांसाठी १२ जुलै रोजी मतदान होणार आहे. त्याच दिवशी सायंकाळी पाच वाजता मतमोजणी होणार आहे. याकरता निवडणूक आयोगाकडून २५ जून रोजी अधिसूचना जारी केली जाणार आहे.
नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर सर्वच राजकीय पक्षांचं लक्ष विधान परिषदेच्या जागांवर लागलं आहे. लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचे ३१ खासदार निवडून आल्याने आघाडीचं मनोबल उंचावलं आहे. राज्यातील १५० पेक्षा अधिक मतदारसंघात महाविकास आघाडीला बढत मिळाली असल्याने शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील बंडखोर आमदार आपल्या संपर्कात असल्याचा दावा शिवसेना ठाकरे गट आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून केला जात आहे.
यामुळे ही निवडणूक अटीतटीची आणि रंगतदार होणार आहे. विधानसभेच्या २८८ जागांपैकी १० जागा या आमदारांच्या राजीनाम्यामुळे तर ४ जागा या आमदारांच्या निधनामुळे रिक्त आहेत. अशा परिस्थितीमध्ये २७४ विधानसभा सदस्यांमधून ११ उमेदवार निवडून द्यायचे आहेत. यामुळे पहिल्या पसंतीच्या मतांच्या कोट्यामध्ये घट झाली आहे. भाजपा त्यांच्या ५ जागा निवडून आणण्यासाठी प्रयत्न करणार आहे. तर एकनाथ शिंदे गट अजित पवार गटही प्रत्येकी २ जागांसाठी प्रयत्न करतील.
काँग्रेसचे २ सदस्य जरी निवृत्त होत असले तरी त्यांचा १ सदस्य सहज निवडून येईल. परंतु दुसऱ्या सदस्यासाठी त्यांना अधिक प्रयत्न करावे लागणार आहेत. शरद पवार गट आणि ठाकरे गट यांच्याकडे स्वबळावर उमेदवार निवडून आणण्यासाठी पुरेसे संख्याबळ नसल्याने त्यांना मतांसाठी जुळवाजुळवी करावी लागणार आहे.
विधान परिषदेतून निवृत्त होणाऱ्या सदस्यांमध्ये विजय गिरकर (भाजपा), निलय नाईक (भाजपा), रमेश पाटील (भाजपा), रामराव पाटील (भाजपा), महादेव जानकर (भाजपा मित्र पक्ष), अनिल परब (उबाठा गट), मनीषा कायंदे, डॉ. प्रज्ञा सातव (काँग्रेस), डॉ. वजाहत मिर्झा (काँग्रेस), अब्दुल खान दुराणी (राष्ट्रवादी अजित पवार गट), जयंत पाटील (शेकाप) या सदस्यांचा समावेश आहे.


