गुरुवार, २० जून
अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदार संघातून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे उमेदवार निलेश लंके यांच्याकडून यांचा २९ हजार ३१७ मतांनी पराभूत झालेल्या माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी ईव्हीएम मशीनवर आक्षेप नोंदवला आहे. त्यांनी ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅटची चौकशी करण्याची मागणी केली आहे.
दरम्यान लोकसभा निवडणुकीत पराभूत झालेल्या विखे पाटील यांच्यासह अनेक पराभूत उमेदवारांनी अशा प्रकारचा अर्ज निवडणूक आयोगाकडे केला असून इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन (EVM)आणि वोटर वेरिफिएबल पेपर ऑडिट ट्रेल युनिटची (VVPAT) चौकशी करण्याची मागणी केली.
या संदर्भात इकोनॉमिक टाईम्सने दिलेल्या वृत्तानुसार, ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅट मशीनची चौकशी करण्यासंदर्भात निवडणूक आयोगाला एकूण १० अर्ज मिळाले आहेत. यातील बहुतांश उमेदवारांनी एक ते तीन ईव्हीएम युनिटच्या पडताळणीची मागणी केली आहे. मात्र, काही उमेदवारांनी यापेक्षा अधिक युनिटची चौकशी करण्याची मागणीही केली. या उमेदवारांना प्रत्येक ईव्हीएम युनिटसाठी ४०,००० रुपये आणि त्यावर १८ टक्के जीएसटी भरावा लागेल.
पंतप्रधान मोदींसह बड्या नेत्यांच्या झाल्या होत्या सभा…
अहमदनगर लोकसभा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार सुजय विखे पाटील यांनी विधानसभा मतदारसंघनिहाय ईव्हीएम युनिटची चौकशी करण्याची मागणी केली. शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे नीलेश लंके यांनी त्यांचा २८ हजार ९२९ मतांनी पराभव केला आहे. ही निवडणूक राज्यातील महत्त्वपूर्ण लढतीपैकी एक लढत मानली जात होती. विखे यांच्या प्रचारासाठी स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदींसह राज्यातील भाजपाच्या बड्या नेत्यांनी या मतदारसंघात सहभाग घेतल्या होत्या.
कोण अर्ज दाखल करू शकतात?
लोकसभा निवडणुकीदरम्यान सर्वोच्च न्यायालयाने सर्व २६ एप्रिल २०२४ रोजी ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅट स्लिप जुळवण्याची याचिका फेटाळली. मतमोजणीनंतर सात दिवसांच्या आत उमेदवारांनी निवडणूक आयोगाकडे अर्ज करावा, असे सर्वोच्च न्यायालयाने सांगितले. प्रत्येक विधानसभा मतदारसंघातील जास्तीत जास्त ५ टक्के ईव्हीएम मशीन तपासण्यासाठी देऊ शकता. असे अर्ज केवळ उपविजेते आणि द्वितीय उपविजेतेच दाखल करू शकतात. प्रत्येक ईव्हीएम मशीनच्या पडताळणीसाठी ४० हजार रुपये आणि जीएसटी भरावा लागेल. पडताळणीदरम्यान ईव्हीएममध्ये काही दोष आढळल्यास ही रक्कम उमेदवारांना परत केली जाईल.”
“डॉ. सुजय विखे यांना अद्यापही पराभव मान्य होत नाही. त्यांनी आता तो स्वीकारला पाहिजे. पण विखे कुटुंबाला तसा इतिहास आहे. पूर्वी यशवंतराव गडाख यांच्याबाबतही विखे कुटुंबीय अशाच पद्धतीने वागले होते. आता ईव्हीएम व व्हीव्हीपॅटबाबत शंका उपस्थित केली म्हणजे विखे यांनी केंद्रीय यंत्रणांवरच आक्षेप घेतला आहे.” … खासदार नीलेश लंके, अहमदनगर
“जनतेने दिलेला कौल मान्य आहेच. मात्र, अनेक ठिकाणांहून कार्यकर्त्यांच्या शंका आणि तीव्र मागणी होती. त्यामुळे तेथील इव्हीएम-व्हीव्हीपॅट पडताळणी करण्याची मागणी नियमानुसारच निवडणूक आयोगाकडे केली आहे. यात कोणतेही राजकारण नाही. यातून कोणीही वेगळा अर्थ काढू नये.” – माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील.



