गुरुवार, २० जून
दोन मुलांचा शेततळ्यात टाकून खून केल्याप्रकरणी पोलिसांनी या मुलांच्या आईसह तिच्या प्रियकराला अटक केली असून दोन्ही आरोपींना न्यायालयाने चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
कविता सारंगधर पावसे व सचिन बाबाजी गाडे अशी पोलिसांनी अटक केलेल्या दोन्ही आरोपींची नावे आहेत. तब्बल दोन महिन्यानंतर या खून प्रकरणाला वाचा फुटली आहे. स्थानिक ग्रामस्थांनी पोलीस यंत्रणेवर आंदोलनाच्या माध्यमातून दबाव वाढविल्यानंतर पोलिसांनी याप्रकरणी तपास करत प्रत्यक्षदर्शीच्या फिर्यादीवरून खुनाचा गुन्हा दाखल केला असल्याची माहिती मिळते.
संगमनेर तालुक्यातील हिवरगाव पावसा येथे राम नवमीच्या दिवशी १७ एप्रिल रोजी शेततळ्यात दोन शाळकरी मुलांचा मृतदेह आढळून आला होता. याप्रकरणी संगमनेर तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली होती. मात्र या प्रकरणामागे वेगळीच कारणे असल्याने स्थानिक ग्रामस्थांनी पोलिसांनी सखोल तपास करण्याची मागणी केली होती. मात्र पोलिसांकडून प्रत्यक्षात कोणतेही कार्यवाही होताना दिसत नव्हती.
त्यामुळे स्थानिक ग्रामस्थांनी हिवरगाव पावसा येथील टोल नाक्यावर रास्ता रोको आंदोलन करत पोलीस यंत्रणेवर दबाव वाढविला होता. अखेरीस बुधवारी पोलिसांनी मृत मुलांची आई आणि तिच्या प्रियकराविरोधात खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. सचिन गाडे याला बुधवारी अटक करण्यात आली होती. तर गुरुवारी पहाटे गाडे याची प्रेयसी व मृत मुलांची आई कविता पावसे हिला अटक करण्यात आली. दोन्ही आरोपींना न्यायालयात हजर केल्यानंतर न्यायालयाने चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.



