शुक्रवार, २१ जून
अहमदनगर जिल्ह्यातील अंत्योदय व प्राधान्य कुटुंब योजनेतील लाभार्थ्यांनी रेशन घेण्यासाठी आपल्या रास्त भाव दुकानातून ३० जून पर्यंत ई-केवायसी करून घेण्याचे आवाहन अहमदनगरच्या जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांमार्फत करण्यात आले आहे.
नगर जिल्ह्यात सार्वजनिक वितरण व्यवस्था अंतर्गत रास्त भाव दुकानामार्फत अंत्योदय व प्राधान्य कुटुंब लाभार्थ्यांना धान्याचे वितरण करण्यात येते. राज्य शासनाच्या निर्देशानुसार नगर जिल्ह्यातील २९ लाख ३४ हजार ४८५ लाभार्थ्यांचे ई-केवायसी आधार प्रमाणीकरण करणे बंधनकारक करण्यात आले आहे.
अंत्योदय व प्राधान्य कुटुंब योजनेतील लाभार्थ्यांच्या शिधापत्रिकेसोबत संलग्न करण्यात आलेले आधार क्रमांक बरोबर असल्याचे तसेच शिधापत्रिकेमध्ये नमुद असलेल्या व्यक्ती त्याच आहेत, याची खात्री करण्यासाठी ई-केवायसी प्रणाली उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्याव्दारे आधार क्रमांक संलग्न शिधापत्रिकेमध्ये नमुद योग्य व्यक्ती तीच असल्याची खात्री होणार आहे.
जिल्ह्यातील सर्व रास्तभाव दुकानामार्फत तेथील ई-पॉस मशिनद्वारे ई-केवायसी केली जाणार असल्याचेही प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविण्यात आले आहे.



