शुक्रवार, २८ जून
राज्याचे महसूल मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या जिल्ह्यातील चवरसांगवी (श्रीगोंदा) येथे वाळू तस्करांकडून महसूलच्या पथकावर झालेल्या हल्ल्यानंतर जिल्ह्यातील महसूलचे कर्मचारी आंदोलनात उतरले आहे. यामुळे जिल्ह्यात महसूलचे कामकाज बंद पडले असून कामानिमित्त आलेल्या जनतेचे हाल सुरू आहे.
राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील सध्या मुंबईत अधिवेशनात व्यस्त आहे. त्यामुळे जिल्ह्यात सुरू असलेल्या आंदोलनाकडे त्यांचे दुर्लक्ष झाले असून जिल्ह्यातील महसूल यंत्रणेचे कामकाज बंद पडले असल्याचे दिसते. संगमनेर मध्ये देखील कामानिमित्त आलेले नागरिक तहसील कार्यालयात ताटकळताना दिसत होते. किरकोळ ॲफिडेव्हिटसारखी कामे मार्गे लावण्यासाठी देखील कोणताही अधिकारी दुपारी बारा वाजेपर्यंत तहसील कार्यालयात उपलब्ध नसल्याने नागरिकांचे हाल झाले.
दरम्यान या संदर्भात संगमनेरचे तहसीलदार धीरज मांजरे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांच्याकडून प्रतिसाद मिळू शकला नाही. प्रत्यक्षात तहसील कार्यालयात बाराच्या सुमारास पाहणी केली असता एकही अधिकारी जागेवर नव्हता. नायब तहसीलदारांच्या केबिनची दारेदेखील बंद होती.

नव्या शैक्षणिक वर्षासाठी विद्यार्थ्यांना लागणारी शालेय कागदपत्रे, विविध प्रकारचे दाखले काढण्यासाठी आलेल्या विद्यार्थ्यांसह पालकांची फरफट झाली. तर खरिपाचा हंगाम सुरू असल्याने शेती विषयक विविध कारणांसाठी लागणारी महसुली कागदपत्रे काढण्यासाठी आलेल्या तालुक्यातील शेतकऱ्यांचा खोळंबा झाला होता. याशिवाय आवश्यक कामांसाठी लागणारे किरकोळ स्वरूपाचे ॲफिडेव्हिटवर सह्या करण्यासाठी देखील कोणताही अधिकारी उपलब्ध होत नसल्याने तहसील कार्यालयात आलेल्या नागरिकांचे हाल होताना दिसत होते.
एकूणच आंदोलनादरम्यान जिल्हा प्रशासनाची महसूल यंत्रणेवरील पकड सैल झाल्याचे दिसत होते. यामध्ये दूरवरून आलेल्या नागरिकांना मात्र नाहक मनस्ताप सहन करावा लागला.
काय आहे घटना… आजी माजी महसूल मंत्र्यांच्या जिल्ह्यात श्रीगोंदे तालुक्यातील चवरसांगवी येथे सीना नदीपात्रात शनिवारी रात्री अवैध वाळू उपशावर कारवाई करण्यासाठी गेलेल्या महसूल विभागाच्या पथकावर हल्ल्याची घटना घडली. पोलिसांकडून संशयितांना अद्यापही अटक न झाल्याने महसूल कर्मचाऱ्यांनी जिल्ह्यात काम बंद आंदोलन सुरू केले आहे.
आंदोलनादरम्यान नागरिकांचे हाल नकोत…
महसूल पथकावर झालेल्या हल्ल्याप्रकरणी संबंधितांवर तातडीने कारवाई होणे अपेक्षित आहे. आरपीआयच्यावतीने देखील या घटनेचा आम्ही निषेध करत आहोत. अन्यायाविरोधात कर्मचाऱ्यांनी आंदोलन करणे देखील चुकीचे नाही. मात्र विविध कामांसाठी नागरिक तालुक्याच्या कानाकोपऱ्यातून तहसील कार्यालयात येत असतात. दूरवरून आलेल्या या नागरिकांची गैरसोय होणार नाही याची देखील प्रशासनाने दखल घेण्याची आवश्यकता आहे. – कैलास कासार, शहराध्यक्ष, आरपीआय (आठवले)


