मंगळवार, २ जुलै
पावसाळी अधिवेशनादरम्यान सभागृहात भाजपा आमदार प्रसाद लाड यांच्यावर खालच्या पातळीवर टीका केल्याप्रकरणी विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. अंबादास दानवे यांचं पाच दिवसांसाठी निलंबन करण्यात आलं आहे.

विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन सध्या सुरू आहे. अधिवेशनादरम्यान सभागृहामध्ये दानवे यांनी लाड यांच्यावर खालच्या पातळीवर टीका करत शिवीगाळ केली, असा आरोप भारतीय जनता पार्टीने करत दानवे यांच्यावर कारवाईची मागणी केली होती.
सोमवारी (१ जुलै) विधानपरिषदेत सत्ताधारी आणि विरोधी पक्षांचे आमदार आमने-सामने आले होते. यावेळी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केलेल्या वक्तव्यावर भाजपा आमदार आक्रमक झाले होते. भाजपकडून दानवे यांच्या राजीनाम्याची मागणीही केली गेली. त्यानंतर आमदार प्रसाद लाड यांनी विधानभवनाच्या पायऱ्यांवर आंदोलन केलं होतं. त्यामुळे विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांना काही काळ सभागृहाचं कामकाज स्थगित करावं लागलं.
सभागृहाचे कामकाज सुरू झाल्यानंतर भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते, मंत्री चंद्रकांत पाटील यांनी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी विरोधी पक्षनेते पदाचा राजीनामा द्यावा आणि माफी मागावी. शिवाय दानवे यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात यावी यासाठी ठराव मांडला होता. या अनुषंगाने उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी दानवे यांचे पाच दिवसांसाठी निलंबन केलं आहे. पाच दिवसांच्या या कालावधीत दानवे यांना सभागृहात येता येणार नाही. त्यामुळे विरोधी पक्ष नेत्याविना सभागृहाचे काम चालेल.


