बुधवार, ३ जुलै
अनेकदा संगमनेरमधील भेसळयुक्त तेल कंपन्यांविरुद्ध तक्रारी करून निवेदने देऊन देखील शासन स्तरावर कोणतीही कारवाई न झाल्याने अखेरीस या तेल कंपन्या सील करून कायदेशीर कारवाई करण्याच्या मागणीसाठी सामाजिक कार्यकर्ते, शिवसैनिक सुनील घुले यांनी प्रशासकीय इमारतीबाहेर उपोषण सुरू केल्यानंतर भेसळखोरीचा आरोप असलेल्या व्यापाऱ्यांच्या मदतीला त्यांची संघटना तत्परतेने धावली आहे. आरोप असलेल्या व्यापाऱ्यांच्या खुलाश्या अगोदरच संघटना व्यापाऱ्यांना ‘क्लीन’ सर्टिफिकेट देऊन मोकळी झाली. याशिवाय असोसिएशनने माध्यमांवर देखील या तेल व्यापाऱ्यांचा अपप्रचार केल्याचा ठपका ठेवला आहे.
श्याम ऑइल मिल, भंडारी ॲग्रो आणि एस. व्ही. आसावा या तीन तेल विक्रेत्या कंपन्यांच्या खाद्य तेलाची पुण्यातील एका नामांकित लॅब मध्ये तपासणी केल्यानंतर खाद्यतेलात भेसळ असल्याचे समोर आले. त्यामुळे संबंधित कंपन्यांवर कारवाईसाठी सुनील घुले यांनी सातत्याने पाठपुरावा केला. मात्र व्यापाऱ्यांच्या बलाढ्य ताकतीपुढे प्रशासकीय यंत्रणा त्यांच्यावर कोणतेही कारवाई करू शकले नाही. त्यामुळे घुले यांनी कारवाईसाठी उपोषणाचा मार्ग अवलंबला होता. दोन दिवस त्यांनी प्रांताधिकारी कार्यालयाबाहेर उपोषण केल्यानंतर संबंधित विभागाकडून मिळालेल्या आश्वासनावर त्यांनी उपोषण मागे घेतले. दरम्यान मधल्या दोन-तीन महिन्याच्या कालावधीत शांत असलेली व्यापाऱ्यांची संघटना अचानक या आरोप असलेल्या व्यापाऱ्यांच्या मदतीला उभी राहिली.
संबंधित व्यापाऱ्यांनी खुलासा करण्याअगोदरच व्यापाऱ्यांच्या संघटनेने तत्परता दाखवत पानभर खुलासा माध्यमाकडे पाठवून दिला. यात संबंधित व्यापाऱ्यांना क्लीनचीट देत त्यासंबंधीचे कोणतेही कागद, तपासणीचे रिपोर्ट त्यांनी माध्यमांना दिले नाही. उलट माध्यमांवर या व्यापाऱ्यांसंदर्भात दोन-तीन महिन्यांपासून पेपर मीडिया व इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये खाद्यतेल भेसळीबाबत अपप्रचार केल्याचा, हेतूपूर्वक बदनामी केल्याचा ठपका ठेवला.
खाद्यतेलात भेसळीचा संशय आल्याने उपोषणार्थी घुले यांनी संगमनेरमधील श्याम ऑइल मिल, भंडारी ॲग्रो आणि एस. व्ही. आसावा या तीन तेल विक्रेत्या कंपन्यांकडून शेंगदाणा तेल, पामतेल, सूर्यफूल आदी प्रकारच्या तेलाची खरेदी करत त्याची तपासणी पुण्यातील नामांकित लॅबमध्ये करून घेतली असता या तिन्ही उत्पादकांच्या खाद्यतेलात भेसळ असल्याचा धक्कादायक अहवाल लॅबकडून प्राप्त झाला. त्यामुळे कारवाईसाठी घुले यांनी पाठपुरावा केला. त्यांनी उपोषण सुरू करतात व्यापाऱ्यांच्या संघटनेने केलेली सारवासारव लक्षात घेत उपोषणकर्ते घुले यांनी संबंधित तेलाची तपासणी केलेल्या लॅबचे रिपोर्ट चुकीचे असतील तर लॅबवर आणि माझ्यावर गुन्हा दाखल करा अशी भूमिका घेतली.
त्यामुळे अहमदनगरचा अन्न औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी संगमनेरमध्ये खाद्यतेलाचे नमुने किराणा विक्रेत्यांकडून तपासणीसाठी ताब्यात घेतले. या कारवाईदरम्यान संबंधित कंपन्यांचा तेल साठा दुकाने आणि गोडाऊनमधून गायब झाल्याच्या चर्चा शहरात सुरू होत्या. तसेच नागरिकांच्या प्रश्नासाठी रस्त्यावर उतरणाऱ्या शिवसेनेसह (उद्धव बाळासाहेब ठाकरे) विविध पक्षाच्या आणि सामाजिक संघटनांच्या प्रतिनिधींनी घुले यांच्या उपोषणाला पाठिंबा दर्शविला.

संगमनेरकरांनो बघा आणि विचार करा, संघटनेचे काय म्हणणे आहे… व्यापारी संघटनेचे सदस्य असलेल्या मे. एस. व्ही. आसावा, मे. शाम ऑइल इंडस्ट्रीज, मे. भंडारी ॲग्रो यांच्याविरुद्ध मागील दोन-तीन महिन्यापासून पेपर मीडिया व इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये खाद्यतेल भेसळी बाबत अपप्रचार सुरू आहे व त्यांची बदनामी हेतूपूर्वक करण्यात येत आहे.
ह्या तीनही व्यापाऱ्यांच्या विरोधात भेसळीचे आरोप केल्यानंतर अन्न औषध प्रशासनाने यांच्याकडून खाद्यतेलांचे नमुने घेऊन प्रशासनाने त्याची तपासणी केली असता संबंधित खाद्यतेल हे प्रमाणित आहे असे सिद्ध झाले आहे. असे प्रमाणपत्र अन्न औषध प्रशासनाकडून संबंधित व्यापाऱ्यांना प्राप्त झाले आहे. हे तीनही व्यापारी अनेक वर्षापासून खाद्यतेल व्यवसायात आहेत मागील अनेक वर्षापासून या व्यापाऱ्यांवर एकही भेसळीची केस नाही किंवा गुन्हा नोंद नाही. तीनही व्यापाऱ्यांच्या प्रतिष्ठेला व सचोटीला जो धक्का लावण्याचा व बदनामी करण्याचा प्रयत्न केला जात आहे तो केवळ ह्या व्यापाऱ्यांची बदनामी नसून समस्त व्यापारी वर्गाची बदनामी आहे व संपूर्ण व्यापारी वर्गाच्या प्रतिष्ठेला व सचोटीला पण हेतुपूर्वक धक्का लावण्याचा प्रयत्न केला जात आहे. म्हणून सदरच्या तीनही व्यापाऱ्यांच्यावतीने सर्व संगमनेरकरांना संघटना खुलासा व आवाहन करीत आहे की, या तीनही व्यावसायिकांच्या विरोधात खाद्यतेल संदर्भात येणाऱ्या अप्रचारावर विश्वास ठेऊ नये.
नेत्याच्या बंगल्याचे उंबरठे झिजविण्याची गरज काय?
दरम्यान घुले यांच्या उपोषणानंतर मदतीला एकीकडे व मतदानावेळी दुसरीकडे अशी भूमिका बजावणाऱ्या काही लोकांनी चौकशीचा ससेमिरा थांबवण्यासाठी राज्याच्या राजकारणातील बड्या नेत्याचे उंबरठे झिजवले असल्याची चर्चा समोर येत आहे. व्यापाऱ्यांची बाजू रास्त असेल, व्यापार स्वच्छ असेल तर नेत्याचे उंबरठे झिजविण्याची गरज काय? असा प्रश्न देखील या चर्चेतून समोर आला आहे.

