मुंबई | प्रवीण पुरो
राज्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या दुधाला योग्य भाव द्या, या प्रमुख मागणीसाठी पावसाळी अधिवेशनाच्या सातव्या दिवशी म्हणजेच गुरुवारी विधिमंडळ परिसरात महाविकास आघाडीचे आमदार आक्रमक झालेले पाहायला मिळाले.
दूध भावाच्या प्रमुख मागणीसाठी विरोधी पक्षाच्या आमदारांनी हातात दुधाची बाटली आणि टाळ घेऊन ‘रामकृष्ण हरी शेतकरी फिरतोय दारोदारी’ असा हरीनाम गजर करत महायुतीच्या सरकारच्या विरोधात जोरदार निदर्शने केली. यावेळी महाविकास आघाडीतील अनेक आमदार विधिमंडळाच्या पायऱ्यांवर निदर्शन करताना पाहायला मिळाले.
विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात आले. पावसाळी अधिवेशनात दूध उत्पादक शेतकऱ्यांना दुधाला भाव मिळत नाही, यासाठी महाविकास आघाडीच्या आमदारांनी विधान भवनाच्या पायऱ्यांवर जोरदार निदर्शने केली. “दूध भुकटी धोरण, शेतकऱ्यांचे होते मरण”, “अनुदानाची भीक नको, शेतकऱ्यांना द्या हक्काचे दर”, “अनुदानाची कशाला दाखवताय आस, भुकटी आयात करून पाडताय भाव”, “दुधाला नाही दर, सरकार वसूल करते शेतकऱ्यांकडून कर” अशा विविध घोषणा लिहिलेले फलक हाती घेत शेतकऱ्यांच्या दुधाला योग्य दर मिळावा यासाठी महायुती सरकारला विरोधकांकडून घेरण्यात आले.
दुधाला योग्य भाव न देणाऱ्या सरकारचा धिक्कार असो, शेतकऱ्यावर अन्याय करणाऱ्या सरकारचा धिक्कार असो, शेतकऱ्याला फसवणाऱ्या सरकारचा धिक्कार असो, शेतकरी लागला दारोदारी सरकार स्वतःचे पोट भरी, दुधाला भाव तरी द्या रे, शेतकरी फिरतोय दारोदारी, सरकार अदानीचे पोट भरी अशी जोरदार घोषणाबाजी करत विरोधकांनी आंदोलन केले.


यावेळी विरोधकांनी हातात टाळ घेत, भजन करत सरकारचा निषेध करण्यात आला. भजनाद्वारे विरोधकांनी शेतकऱ्यांच्या विविध समस्या यावेळी मांडल्या. विरोधकांनी पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवसापासून नियमितपणे विधिमंडळाच्या पायऱ्यांवर आंदोलन केले आहे.
विविध मुद्द्यांवरून विरोधकांनी सरकारला वारंवार घेरण्याचा प्रयत्नही केला. पावसाळी अधिवेशनाच्या पाचव्या दिवशी मंगळवारी सत्ताधाऱ्यांनी विशेषतः विधान परिषदेचे भाजपा आमदार प्रसाद लाड यांनी परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्याविरोधात आंदोलन केले. पण यावेळीही विरोधकांनी संविधानाची प्रत हातात घेऊन सत्ताधाऱ्यांचे आंदोलन हाणून पाडले.


