शनिवार ६ जुलै
खरीप हंगामातील पर्जन्यमान चांगले झाले असल्याने जिल्ह्यातील सर्व भागात पेरण्यांची कामे पूर्णत्वास जात आहे. शेतकऱ्यांकडून रासायनिक खतांची मागणी वाढत असून खतांची मागणी जास्त असल्याचे पाहून काही खत कंपन्या आणि विक्रेते हे एका खतासोबत दुसरे खत किंवा औषधे घेण्याची शक्ती शेतकऱ्यांना करत आहे. यासंदर्भात तक्रारी प्राप्त होत असून संबंधित कंपन्या आणि विक्रेत्यांवर कठोर कारवाई करण्याचे आदेश अहमदनगरचे जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी दिले आहे.
जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांच्या उपस्थितीत राजस्व सभागृहामध्ये कृषी विभागाचे अधिकारी, खत कंपन्यांचे प्रतिनिधी आणि जिल्ह्यातील खत विक्रेते संघटनेच्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीच्या आयोजन करण्यात आले होते. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सुधाकर बोराळे, कृषी विकास अधिकारी निलेश कानवडे, मोहीम अधिकारी अमृत गांगर्डे, जिल्हा गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक राहुल ढगे, खत विक्रेते जिल्हा अध्यक्ष सतीश मुनोत तसेच सर्व तालुका खत विक्रेते पदाधिकारी आणि खत कंपनी प्रतिनिधी उपस्थित होते.
किरकोळ खत विक्रेते किंवा डीलर यांना खताची बळजबरी करणाऱ्या कंपनीची नावे पुरेशा पुराव्यासह विक्रेत्यांनी दिल्यास त्या कंपनीवर पुराव्याच्या आधारे तातडीने कारवाई करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले.
बैठकीत जिल्ह्यातील खरीप हंगाम परिस्थितीचा आढावा घेण्यात आला. मुबलक प्रमाणात खताचा साठा जिल्ह्यात उपलब्ध असून खताची टंचाई भासणार नाही. टंचाई निर्माण झाल्यास युरिया व डीएपी या खतांचा संरक्षित साठा केला असल्याची माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सुधाकर बोराळे यांनी दिली.