प्रवीण पूरो / मुंबई
विश्वचषक जिंकणाऱ्या भारतीय संघातील मुंबईतील चार खेळाडूंचा राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते वर्षा निवासस्थानी आणि नंतर विधानभवन येथे सत्कार केला. राज्य सरकारच्यावतीने भारतीय टीमला ११ कोटी रुपये देण्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली.
अमेरिका आणि वेस्ट इंडिज येथे पार पडलेल्या टी ट्वेंटी विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघानं दक्षिण आफ्रिकेवर रोमहर्षक विजय मिळाल्यानंतर सर्व देशवासीयांनी भारतीय संघाचं तोंड भरून कौतुक करत जल्लोष साजरा केला होता. मायदेशी परतल्यानंतर मुंबईत भारतीय संघाचा विश्वचषकासह रोड शो पार पडला. त्यानंतर वानखेडे मैदानावर भव्य कार्यक्रम झाला. संघाला सव्वाशे कोटी रुपयांचं बक्षीस देण्यात आलं.

तब्बल ११ वर्षानंतर भारतीय क्रिकेट संघाने क्रिकेट विश्वचषक जिंकला आहे. वेस्टइंडीज आणि अमेरिका येथे नुकत्याच पार पडलेल्या टी-२० विश्वचषकात भारताने जोरदार कामगिरी करत विश्वचषकावर आपलं नाव कोरल. शेवटच्या षटकापर्यंत रंगलेल्या भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका अंतिम सामन्यात भारताने रोमहर्षक विजय मिळवला. बीसीसीच्यावतीने देशभरातून भारतीय क्रिकेटच्या चाहत्यांकडून भारतीय क्रिकेट संघाचं कौतुक करून ठिकठिकाणी जल्लोष देखील साजरा करण्यात आला होता.
टी ट्वेंटी विश्वचषकासह भारतीय संघ गुरुवारी मायदेशी परतला, गुरुवारी संध्याकाळी बीसीसीआयच्यावतीने भव्य दिव्य कार्यक्रम मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर पार पडला.

शुक्रवारी महाराष्ट्र राज्य विधिमंडळाच्यावतीने विजेत्या भारतीय संघातील मुंबईतील चार खेळाडूंचा सत्काराचा सोहळा विधानभवनातील सेंट्रल हॉलमध्ये पार पडला. त्यापूर्वी राज्याचे मुख्यमंत्री शिंदे यांचे निवासस्थान असलेल्या वर्षा निवासस्थानी, भारतीय संघाचा कप्तान रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव , शिवम दुबे आणि यशस्वी जयस्वाल दाखल झाले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून चौघा खेळाडूंचा सत्कार करण्यात आला.
मुख्यमंत्र्यांकडून सत्कार स्वीकारल्यानंतर भारतीय संघाचा कप्तान रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव , शिवम दुबे आणि यशस्वी जयस्वाल आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे विधानभवनाकडे रवाना झाले. तिथे विधानभवनाच्या चौथ्या मजल्यावरील सेंट्रल सभागृहात शानदार सत्कार सोहळा पार पडला. रोहित शर्मासह तिन्ही खेळाडूंनी अगदी थोडक्यात महाराष्ट्राच्या शाबासकीची प्रशंसा केली.
रोहितने राज्याकडून होणारा गौरव कदापि न विसरण्यासारखा असल्याचं म्हटलं. तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वानखेडेच्या ऐतिहासिक वास्तूला नजरेसमोर ठेवून मुंबईत एक लाख प्रेक्षक संख्या असलेलं स्टेडियम उभारण्याची गरज प्रतिपादन केली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी क्रिकेटमध्ये सुवर्णाक्षरानी नाव कोरावं अशी कामगिरी संघाने केल्याचे कौतुकोत्गार काढले. यावेळी शिंदे यांनी संघाला ११ कोटी रुपये देण्याची घोषणा केली. यावेळी विधानपरिषद उपसभापती निलम गोऱ्हे, उपमुख्यमंत्री अजित पवार, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांची भाषणं झाली.


