मंगळवार, ०९ जुलै : मुंबई
विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात आमदार भाई गिरकर आणि जयंत पाटील यांनी विधान परिषदेत उपस्थित केलेल्या अंगणवाड्यांच्या प्रश्नावर वाजवी दरानुसार अंगणवाडी जागेचे भाडे द्यावे तसेच अंगणवाड्यांना आपण भेटी देणार असल्याची माहिती उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी दिली आहे.
गिरकर यांनी अधिवेशनात भंडारा जिल्ह्यातील अंगणवाडी केंद्राचा मुद्दा उपस्थित करत १४१७ अंगणवाडी केंद्रे भंडारा जिल्ह्यात कार्यरत असून त्यापैकी १२४८ अंगणवाडी केंद्रे हे स्वमालकीच्या इमारतीत आहे. उर्वरित अंगणवाड्याना स्वमालकीची इमारत नसल्याचे सभागृहाच्या निदर्शनास आणून दिले.
यावर उत्तर देताना मंत्री अदिती तटकरे यांनी अंगणवाडीच्या बांधकामासाठी जिथे जागा उपलब्ध होत नाही अशा ठिकाणी त्या भाडे तत्त्वावर असतात, भाड्यासाठी देण्यात येणारा निधीमध्ये सुद्धा या वर्षीपासून वाढ करण्यात आली आहे असे त्यांनी नमूद केले. तसेच ८०८४ नवीन अंगणवाडीचे प्रस्ताव केंद्राकडे पाठवले असल्याचे देखील त्यांनी सांगितले.
यावर बोलताना आमदार जयंत पाटील यांनी मुंबईतील काही अंगणवाड्यांना इमारत नसल्याचे निदर्शनास आणून दिले. तसेच अनेक अंगणवाड्या या वर्गणी गोळा करून चालवल्या जातात हे देखील त्यांनी सांगितले. उपसभापती डॉ. गोऱ्हे यांनी या अंगणवाड्यांना भेट द्यावी आणि तिथली परिस्थिती समजून घ्यावी अशी विनंती केली.
यावर बोलताना उपसभापती डॉ. गोऱ्हे यांनी वाजवी दरानुसार अंगणवाडीच्या जागेचे भाडं दिले पाहिजे, असे शासनास सूचित केले. तसेच लवकरात लवकर राज्यातील अंगणवाड्यांना भेटी देणार असल्याचे सांगितले.



