विशेष प्रतिनिधी, मुंबई
राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन सुरू झाल्यापासून विधान परिषदेत उपसभापती नीलम गोऱ्हे यांच्या विरोधातील विरोधकांच्या कुरबुरी सतत वाढत आहेत. परिणामी उपसभापतींना विचारलेल्या जाबानंतर त्यांनी चक्क माघार घेत स्वतःच केलेली शेरेबाजी तपासून ती कामकाजातून काढून घेण्याचा शब्द विरोधकांना द्यावा लागण्याचे घटना सोमवारी सभागृहात घडली.
उपसभापती गोऱ्हे या सभागृहात विरोधकांना बोलू देत नाहीत, असा आरोप अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु झाल्यापासून विरोधी नेत्यांकडून सातत्याने केला जात आहे. आठवड्याभरापूर्वी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांचे निलंबन झाले होते, तेव्हा त्यांनीही असाच आरोप केला होता. सत्ताधाऱ्यांना बोलू दिले जाते, मात्र विरोधकांना बोलण्याची संधी मिळत नाही, असं दानवे यांनी सभागृहात म्हटले होते.
अशातच सोमवारी विधानपरिषदेचे ठाकरे गटाचे नवनिर्वाचित आमदार अनिल परब आणि नीलम गोऱ्हे यांच्यात शाब्दिक संघर्ष दिसून आला. नीलम गोऱ्हे यांनी शुक्रवारी ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांचे नाव घेत अनिल परब यांचे निलंबन करण्याचे वक्तव्य केले होते. यासंदर्भात परब यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. यानंतर नीलम गोऱ्हे यांनी कमीपणा घेतल्याचे पाहायला मिळाले.
मुंबईत सध्या सुरू असलेल्या मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर विधान परिषदेचे कामकाज आज अडीच तासात स्थगित करण्यात आले. मात्र कामकाज स्थगित होण्यापूर्वी नीलम गोऱ्हे यांच्यावर निशाणा साधताना अनिल परब म्हणाले की, उपसभापती यांनी आमच्याबाबत आक्षेप नोंदवला आहे. उपसभापती यांनी दोन दिवसांपूर्वी म्हटलं होतं की, तुम्ही सभागृहात गोंधळ घालता, कारण तुम्हाला उद्धव ठाकरे यांना तुम्ही काय काम करता हे दाखवायचं असतं. आता मी तुम्हाला असं म्हणू का, तुम्हाला मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांना तुम्ही किती काम करताय हे दाखवायचं असत म्हणून आम्हाला बोलू देत नाही. असे मी बोललो तर तुम्हाला किती राग येईल? असा प्रश्न अनिल परब यांनी उपस्थित केला.
परब म्हणाले, मी काय काम करतो हे उद्धव ठाकरे यांना दाखवलं आहे. त्यामुळेच मला चार वेळा त्यांनी आमदार केले आहे. आता हेच जर मी तुमच्याबाबत बोललो तर तुम्हाला किती राग येईल? त्यामुळे तुम्ही तत्काळ माझ्याबाबत जे वक्तव्य केलं आहे, ते सभागृहाच्या कामकाजातून काढून टाका, अशी मागणी अनिल परब यांनी केली.
यावर नीलम गोऱ्हे म्हणाल्या की, मी तुमच्याविषयी अनावधानाने काही बोलून गेली असेल, तर मी असं काही बोलले आहे का? हे तपासते आणि काढून टाकते. नीलम गोऱ्हेंच्या या वक्तव्याने त्यांनी सामोपचाराची भूमिका घेतल्याचे पाहायला मिळाले.
पावसामुळे दोन्ही सभागृहाचे कामकाज स्थगित …
दरम्यान, मुंबईसह ठाणे, पालघर व आजूबाजूच्या जिल्ह्यांना रविवारी मध्यरात्रीपासूनच मुसळधार पावसाने झोडपून काढले आहे. यामुळे आज सकाळीपासूनच नोकरदार वर्गाची तारांबळ उडाली. मध्य रेल्वेची वाहतूक सेवा कोलमडली असून याचा फटका अनेकांना बसला आहे. पावसामुळे मध्य रेल्वेची वाहतूक कोलमडल्याने अनेक आमदार हे एक्सप्रेसमध्ये अडकले होते. महत्त्वाची बाब म्हणजे राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील आणि आमदार अमोल मिटकरी यांनाही या पावसाचा फटका बसला. दोन्ही नेत्यांना रेल्वे ट्रॅकवर उतरत प्रवास करावा लागला. त्यामुळे पावसाच्या पार्श्वभूमीवर विधानसभा आणि विधान परिषद सभागृहाचे कामकाज मंगळवारी सकाळी ११ वाजता स्थगित करण्यात आले.



