गुरुवार ११ जुलै | संगमनेर
ग्लोबल वार्मिंगच्या समस्येवर मात करण्यासाठी ज्येष्ठ नेते, सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात यांच्या संकल्पनेतून सुरू झालेल्या दंडकारण्य अभियाना अंतर्गत सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याच्यावतीने तालुक्यातील चंदनापुरी घाटामध्ये पाच हजार वृक्षांचे रोपन करण्यात आले आहे. याशिवाय गावागावात, तालुक्यातील तीन घाटांमध्ये व ११ विविध डोंगरांवर सहकारी संस्थांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण व संगोपन केले जात असल्याची माहिती अभियानाच्या प्रकल्प प्रमुख दुर्गाताई तांबे यांनी दिली.
कारखान्याच्या वृक्षारोपणावेळी कारखान्याचे अध्यक्ष बाबा ओहोळ, संतोष हासे, कार्यकारी संचालक जगन्नाथ घुगरकर, रमेश गुंजाळ, प्रा. बाबा खरात, शांताराम कढणे, विजय राहणे, उपविभागीय कृषी अधिकारी बाळासाहेब गायकवाड, तालुका कृषी अधिकारी प्रवीण गोसावी, सामाजिक वनीकरण विभागाचे सचिन लोंढे, स्मिता आठरे, अशोक रहाणे, प्रकाश कोटकर, कैलास सरोदे, बबन सावंत, बाळासाहेब फापाळे, शरद गुंजाळ, शंकरराव ढमक आदींसह कारखान्याचे विभाग प्रमुख व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
तांबे म्हणाल्या, लोकनेते आमदार बाळासाहेब थोरात व माजी आमदार डॉ. सुधीर तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली दंडकारण्य अभियानाचे हे १९ वे वर्ष आहे. अभियाना अंतर्गत तालुक्यातील प्रत्येक गावागावात मोकळ्या जागेत वृक्षारोपण केले जात आहे. वृक्षारोपणानंतर त्याच्या संगोपनाची जबाबदारी स्थानिकांवर देण्यात आली आहे.
विविध सहकारी संस्थांच्या वतीने तालुक्यातील ११ डोंगरांवर देखील वृक्षारोपण केले जात आहे. याशिवाय आमदार थोरात यांच्या संकल्पनेतून तालुक्यातील चंदनापुरी, कऱ्हे व कोंची घाटात देखील वृक्षारोपणासह दरवर्षी रस्त्याच्या दुतर्फा रंगीबेरंगी फुलांचे रोपण केले जाते. त्यामुळे पावसाळ्यात आणि हिवाळ्यात हा परिसर नयनरम्य दिसतो. अभियानात नागरिकांनी सहभाग नोंदविण्याचे आवाहन त्यांनी केले. यावेळी ओहोळ यांनी देखील दंडकारण्य अभियाना संदर्भात माहिती दिली. प्रास्ताविक जगन्नाथ घुगरकर यांनी तर सूत्रसंचालन प्राध्यापक बाबा खरात यांनी केले.
रिमझिम पावसात पर्यावरणाची गीत रंगली…
सह्याद्रीच्या रांगेत असलेल्या चंदनापुरी घाटामध्ये हिरवाईचे पांघरून घेतलेले सुंदर डोंगर, रिमझिम पाऊस सुरू असताना प्रा. बाबा खरात यांनी पाऊस व पर्यावरणाची गीते गाऊन वातावरणामध्ये चैतन्य निर्माण केले. यावेळी दुर्गाताई तांबे व इतरांनी या गीतांना साथ देत गाणी म्हणत, हाती टिकाव खोरे घेऊन विविध ठिकाणी वृक्षारोपण केले.


