विशेष प्रतिनिधी | मुंबई
राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाचं शुक्रवारी सूप वाजलं. येत्या तीन महिन्यांत विधानसभा निवडणूक होणार असल्याने विरोधकांनी यंदाच्या विधिमंडळ पावसाळी अधिवेशनात सत्ताधाऱ्यांना घेरण्याचा प्रयत्न केला. काल शेवटच्या दिवशी विधान परिषदेत २६० अनव्ये प्रस्ताव आणि अंतिम आठवडा प्रस्तावावर चर्चा करण्यात आली. यावेळी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी महाराष्ट्रातील गुन्हेगारीवरून सरकारवर परखड टीका केली.
अंबादास दानवे म्हणाले, देशात एकूण ३५ लाख ६१ हजार ३७९ गुन्हे दाखल झाले असून त्यातील ३ लाख ७४ हजार ३८ गुन्हे एकट्या महाराष्ट्रात नोंदविले गेले आहेत. हा दर १०.२ टक्के इतका असून महाराष्ट्र देशात गुन्हेगारीत क्रमांक दोनवर आहे. देशात स्त्री अत्याचाराचे ४ लाख ४५ हजार गुन्हे दाखल झाले असून ४५ हजार गुन्हे एकट्या महाराष्ट्रात दाखल आहेत.
ऍसिड हल्ले, सायबर गुन्हे यात महिलांचे प्रमाण अधिक आहेत. एकीकडे सरकारने लाडकी बहीण योजना आणली आहे; मात्र प्रत्यक्षात महिलांचे संरक्षण करण्यास सरकार अपयशी ठरल्याचा आरोप दानवे यांनी केला आहे.
मुख्यमंत्री यांचा बुलडोझर फक्त काही भागात चालत असून ते कामापेक्षा शोबाजी करत आहेत. राज्यात कायदा आणि सुव्यवस्था राखण्यास हे सरकार पूर्णपणे अपयशी ठरल्याची टीका त्यांनी केली. हे सरकार मोठ मोठया घोषणा सर्वसामान्यांसाठी नव्हे तर कंत्राटदारांच्या हितासाठी करत आहे, अशा शब्दांत दानवे यांनी २६० अनव्ये प्रस्तावावर बोलताना सरकारचे वाभाडे काढले.
सरकार राज्याच्या विकासासाठी काम करत नसून स्वार्थ आणि भ्रष्टाचारासाठी काम करत असल्याचा आरोप त्यांनी केला. गृह विभाग विशिष्ट अधिकारी आणि कंत्राटदार यांच्यासाठी काम करतो? की, प्रस्ताव समोर ठेवून काम करतो? या विभागातील अधिकारी जनतेच्या पैशाचा अपव्यय करतात आणि राज्याला अधोगतीकडे नेण्याचं काम करत आहेत, अशा शब्दांत त्यांनी सरकारवर टीकास्त्र सोडले.


