सोमवार १५ जुलै
संगमनेर शहरातून जाणाऱ्या कोल्हार-घोटी मार्गाचे काम काही दिवसांपूर्वीच पूर्णत्वास गेल्याने हा मार्ग अतिशय चांगला झाला, हा समज संगमनेरात सध्या सुरू असलेल्या पावसाने खोटा ठरविला असून यामुळे ठेकेदाराच्या कामाची पोलखोल झाली आहे. यामुळे सरकारचा या कामावरील पैसा पाण्यात गेला आहे.
संगमनेरमधून जाणाऱ्या नाशिक-पुणे महामार्गाला बाह्यवळण मार्ग मिळाल्यानंतर त्या पाठोपाठ संगमनेरमधून जाणाऱ्या कोल्हार-घोटी मार्गाचेही काम झाल्याने हा रस्ता वाहतुकीसाठी रुंद झाला होता. मात्र या रस्त्याच्या कामाचा दर्जा अतिशय निकृष्ट राहिल्याने वारंवार धुळीचा सामना करावा लागत होता. त्यातच आता पावसाळा सुरू झाल्याने वर्षभराच्या आतच या रस्त्याच्या कामाचे प्रगती पुस्तकच समोर आले आहे.
या कामावर सरकारचा कोट्यावधी रुपयांचा खर्च पाण्यात गेला असल्याचे स्पष्ट होत असून पंचायत समिती ते समनापुर गणपती दरम्यान आणि त्यापुढेही रस्त्यावर मोठमोठाले खड्डे पडले असून या खड्ड्यात पाणी साचून अपघातांची शक्यता निर्माण झाली आहे. याशिवाय रस्त्यावर साचलेल्या पाण्यामुळे रस्ता अनेक ठिकाणी उखडला असल्याचे दिसते.
विशेष म्हणजे रस्त्याच्या कामासोबतच दुतर्फा साईड गटारीचे काम करणे आवश्यक होते. यामुळे रस्त्यावर शासनाने पाणी वाहून जाण्यास मदत झाली असती. मात्र प्रत्यक्षात अशा प्रकारचे कोणतेही काम करण्यात आले नसल्यामुळे रस्त्यावर असणाऱ्या पाण्याने रस्ता उघडण्यास सुरुवात झाली आहे. या रस्त्याच्या कामावर रस्त्याच्या दुतर्फा साईड गटारीचे काम का झाले नाही असा देखील प्रश्न यामुळे उपस्थित झाला आहे. ठेकेदाराच्या प्रत्यक्ष कामात या कामाचा समावेश होता की नाही याबाबत माहिती मिळू शकली नाही.
संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना नागरिकांच्या जीवाची थोडीशी जाण असेल तर त्यांनी रस्त्याच्या या कामात तातडीने लक्ष घालने गरजेचे बनले आहे.
संगमनेरमधील काही जागरूक नागरिकांनी यासंबंधीची छायाचित्रे ‘महाराष्ट्र संवाद न्यूज’ला पाठवत यावर प्रकाश टाकण्याचे आवाहन केले होते. बघा यासंबंधीची छायाचित्रे…




