सोमवार १५ जुलै
शहर आणि उपनगरात घंटागाड्यांच्या माध्यमातून फिरून स्वच्छता आणि नागरिकांच्या आरोग्याची काळजी वाहणाऱ्या कामगारांच्या मोकळ्या मैदानावरील वस्तीमुळे, त्यांच्याकडून होणाऱ्या त्रासामुळे स्थानिक नागरिकांना मोठ्या प्रमाणात त्रासाला सामोरे जावे लागत. शहर स्वच्छतेचा ठेका घेतलेल्या ठेकेदाराने या सफाई कामगारांच्या राहण्याची व्यवस्था इतरत्र करावी, यासाठी परिसरातील नागरिक एकवटले असून या नागरिकांचे त्रासातून मुक्तता करण्यासाठी स्थानिक प्रशासन दखल घेत नसल्याने थेट आरोग्य मंत्रालयाचे दरवाजे ठोठावण्याचा इशारा शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे) माजी शहरप्रमुख प्रसाद पवार यांनी दिला आहे.
शहर स्वच्छतेचा ठेका नाशिकच्या एका कंपनीला देण्यात आला या कंपनीशी संलग्न सफाई कामगारांची शहरातील परदेशपुरा भागातील जुन्या पाण्याच्या टाकीजवळ अनाधिकृत वस्ती निर्माण करण्यात आली असून या सफाई कर्मचाऱ्यांचे अन्यत्र स्थलांतर करण्याची मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे. सफाई कर्मचाऱ्यांच्या वर्तवणुकीमुळे स्थानिक नागरिकांना मोठा मनस्ताप निर्माण झाला आहे. तसेच या कर्मचाऱ्यांमुळे परिसरात स्वच्छतेचे बारा वाजले असून निर्माण झालेल्या कचऱ्यामुळे आणि शौचालयाच्या दुरवस्थेमुळे परिसरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.
स्थानिक नागरिकांनी या संदर्भात पालिकेचे मुख्याधिकारी राहुल वाघ यांना निवेदन देत या कर्मचाऱ्यांचे स्थलांतर करण्याची मागणी केली आहे. मात्र आज उद्या करत वेळ मारून नेण्याचा प्रकार सुरू असल्याचा स्थानिक नागरिकांचा आरोप आहे. त्यामुळे नागरिकांनी उपोषणाचा निर्णय घेतला असून आज उद्या काम मार्गी लावतो असे सांगून उपोषणापासून त्यांना परावृत्त केले जाते.

काय आहे नेमका प्रकार…
- शहरातील कचरा व्यवस्थापनाचा ठेका ज्या कंपनीने घेतला आहे त्या कंपनीने त्यांच्याकडील सफाई कर्मचाऱ्यांची राहण्याची व्यवस्था करणे अपेक्षित आहे. मात्र नगरपालिका प्रशासन ठेकेदाराची पाठराखण करत आहे. या चाळीस सफाई कर्मचाऱ्यांमुळे येथे असलेल्या सार्वजनिक शौचालयाची वाट लागली आहे. कर्मचाऱ्यांनी शौचालयातील दरवाजे, शौचाचे भांडे, नळ तोडले असून मोठ्या प्रमाणात घाण केली आहे. यामुळे मोठ्या प्रमाणात परिसरात दुर्गंधी पसरली असून नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.
- सफाई कर्मचारी या पाण्याच्या टाकीजवळ उघड्यावरच आंघोळ करणे, महिलांना बघून अश्लील हावभाव करणे, बिना कपड्याचे झोपणे अशा प्रकारचे चुकीचे वर्तन करत आहे. याची छायाचित्रे, व्हिडिओ देखील उपलब्ध आहे. हे कर्मचारी ज्या ठिकाणी राहतात तेथे मोठ्या प्रमाणात कचराकुंडी निर्माण झाली आहे. त्यामुळे डेंगू, मलेरिया सारखे गंभीर आजार निर्माण होत असून यामुळे जर नागरिकांच्या जीवित याला धोका निर्माण झाला तर त्याची जबाबदारी नगरपालिका प्रशासनाची असेल, असे स्थानिकांनी म्हटले आहे.
- गेल्या काही महिन्यांपासून स्थानिक नागरिक या प्रश्न आवाज उठवत आहे मात्र सहा महिन्यांचा कालावधी उलटून गेल्यानंतर देखील अद्याप ही वस्ती स्थलांतरित करण्याचे कोणतेही प्रयत्न होताना दिसत नाही. गेल्या पंधरवड्यात या संदर्भात नागरिकांनी मुख्याधिकारी वाघ यांची भेट घेतली असता आठवडाभरात प्रश्न मार्गी लावतो. उपोषणास बसू नका, असे त्यांनी सांगितले मात्र अद्यापही कार्यवाही झालेली नाही.
शिवसेना (उबाठा) स्थानिक नागरिकांसोबत…
या परिसरातील नागरिकांनी या प्रश्न वारंवार संगमनेर नगर परिषदेचे मुख्याधिकारी राहुल वाघ यांची भेट घेतली. परिस्थिती त्यांच्या निदर्शनास आणून दिली. साफसफाई कर्मचाऱ्यांच्या वर्तणुकीमुळे स्थानिक नागरिकांना त्रास होत आहे. येथे उभ्या असलेल्या घंटागाड्यांच्या, शौचालयाच्या दुर्गंधीमुळे आरोग्याची समस्या निर्माण होण्याची चिन्हे आहे. संगमनेर नगरपालिका प्रशासनाने संबंधित ठेकेदारावर कारवाई करून किंवा या कर्मचाऱ्यांचे अन्य ठिकाणी स्थलांतर करून हा प्रश्न मार्गी लावावा. स्थानिक प्रशासन जर नागरिकांना न्याय देणार नसेल तर शिवसेना (उबाठा) स्थानिक नागरिकांसोबत आहे. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांच्याकडे दाद मागितली जाईल. प्रशासनाने स्थानिक नागरिकांचा सहनशीलतेचा अंत पाहू नये. – प्रसाद पवार, माजी शिवसेना शहरप्रमुख.



