विशेष प्रतिनिधी / मुंबई
नुकत्याच पार पडलेल्या विधान परिषद निवडणुकीत सेनेच्या उद्धव ठाकरे गटाने मिलिंद नार्वेकर यांच्या नावाने बारावा उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरवल्यानेच शेकापचे जयंत पाटील यांचा पराभव झाल्याचं स्पष्ट झालंय. ही निवडणूक बिनविरोध होण्यासाठी शरद पवार यांनी प्रयत्न केले होते. मात्र मिलिंद नार्वेकर यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्याचा उद्धव ठाकरेंचा हट्ट त्यांनी अखेरपर्यंत सोडला नाही. हीच जयंत पाटील यांच्यासाठी ती धोक्याची घंटा ठरली. अशात शरद पवार यांनी जयंत पाटील यांना पूर्ण पाठिंबा दिला असला तरी, उद्धव ठाकरे यांचा जयंत पाटील यांच्या उमेदवारीला विरोध होता, अशी चर्चा आता समोर आलीय.
लोकसभा निवडणुकीत उद्धव ठाकरे गटाचे उमेदवार अनंत गीते यांच्या विरोधात जयंत पाटील यांनी प्रचार केल्याचा उद्धव ठाकरे यांना संशय आहे. म्हणून त्यांनी जयंत पाटील यांच्या उमेदवारीस विरोध केला, असं बोललं जातं. इतकंच नाही तर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी विधान परिषद निवडणुकीच्या मतदानाच्या आदल्या दिवशी उद्धव ठाकरे यांच्याशी संपर्क साधण्यासाठी अनेक वेळा फोन केले होते. परंतु उद्धव ठाकरे यांनी त्या फोनला उत्तर दिलं नाही अशी सुद्धा माहिती समोर येत आहे.
मिलिंद नार्वेकर यांच्या विजयासाठी काँग्रेसकडून ज्या आमदारांचा पाठिंबा भेटण्याचा प्रस्ताव उद्धव ठाकरे यांना देण्यात आला होता. त्यामध्ये हिरामण खोसकर, मोहनराव हंबर्डे, सुलभा खोडके, शिरीष चौधरी आणि कुणाल पाटील या आमदारांच्या नावांचा समावेश होता. परंतु या आमदारांची मतं फुटतील अशी भीती उद्धव ठाकरे यांना होती. दुसरीकडे उद्धव ठाकरे यांचे उमेदवार मिलिंद नार्वेकर यांना पाठिंबा द्यायचा की, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार गट पुरस्कृत शेकापचे नेते जयंत पाटील यांना पाठिंबा द्यायचा यावरून काँग्रेसमध्ये सुद्धा दोन गट पडले होते.
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, पृथ्वीराज चव्हाण यांनी उद्धव ठाकरे यांचे उमेदवार मिलिंद नार्वेकर यांना पाठिंबा देण्याची तयारी दर्शवली होती. तर विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार हे शेकाप उमेदवार जयंत पाटलांच्या बाजूने मत देण्याच्या भूमिकेत होते. यामुळं मिलिंद नार्वेकर यांच्या उमेदवारीला धोका निर्माण झाला होता. याच दरम्यान विधान परिषद निवडणुकीच्या आदल्या दिवशी रात्री मुंबईतील हॉटेल इंटर कॉन्टिनेन्टलमध्ये काँग्रेसचे प्रभारी रमेश चेनिथला आणि उद्धव ठाकरे यांच्यात बैठक झाली.
ठाकरे सेना जयंत पाटील यांच्या विरोधात या निवडणुकीत कट रचत असल्याचा आरोप सुद्धा त्यांनी केला. यावरून या बैठकीत तीव्र संघर्ष बघायला भेटला. महाविकास आघाडी निवडणुकीवरून निर्माण झालेला संघर्ष शिगेला पोहोचला होता. अखेर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, के सी पाडवी, सुरेश वरपूडकर, शिरीष चौधरी, मोहनराव हंबर्डे, हिरामण खोसकर आणि सहसराम कोरोटे हे सात जण उद्धव ठाकरे गटाचे मिलिंद नार्वेकर यांच्या समर्थनार्थ मत देतील असा प्रस्ताव अंतिम करण्यात आला.
इतके होऊन सुद्धा ठाकरे गटाचे मिलिंद नार्वेकर यांना पहिल्या पसंतीची २२ मतं मिळाली आणि २३ मतांचा कोटा पूर्ण करण्यासाठी त्यांना शेवटपर्यंत झगडावे लागले. काँग्रेसच्या दुसऱ्या पसंतीच्या मतांवर त्यांचा विजय झाला आणि शेकापचे जयंत पाटील यांचा पराभव झाला. जयंत पाटील यांचा झालेला पराभव हा शरद पवार यांच्यासह काँग्रेसच्याही जिव्हारी लागला असून महाविकास आघाडीतील ही धुसफूस लवकर संपणारी नाही.


