मंगळवार, १६ जुलै
ज्येष्ठ स्वातंत्र्य सेनानी सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात यांच्या संकल्पनेतून पर्यावरण संवर्धनासाठी सुरू झालेल्या दंडकारण्य अभियानाचा शुभारंभ यावर्षी संगमनेर तालुक्यातील पेमगिरी गावाच्या चंदनगड डोंगरावर बुधवारी (१७ जुलै) सकाळी नऊ वाजता होणार असल्याची माहिती प्रकल्प प्रमुख दुर्गाताई तांबे यांनी दिली.
अभियानाचे यंदाचे १९ वे वर्ष आहे. काँग्रेस विधिमंडळ पक्षनेते आमदार बाळासाहेब थोरात व माजी आमदार डॉ. सुधीर तांबे यांच्या उपस्थितीत हा शुभारंभ होत आहे. पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी निसर्गाचे संवर्धन करणे प्रत्येकाची मुलभूत जबाबदारी बनली असून वृक्षारोपन व पर्यावरणाचे संवर्धन करणे भावी पिढयांसाठी काळाची गरज बनली आहे.
आमदार बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली मागील १८ वर्षात तालुक्यातील विविध संस्था, विद्यालये, कार्यकर्ते नागरिकांच्या सहकार्यातून हे अभियान यशस्वीपणे राबविण्यात आले. संगमनेरच्या दंडकारण्य अभियानाची नोंदही आंतरराष्ट्रीय पातळीवर झाली असून या अंतर्गत संगमनेर तालुक्यात वृक्ष संवर्धन संस्कृती मोठ्या प्रमाणात वाढली आहे.
आषाढी एकादशीच्या निमित्ताने पेमगिरी येथील चंदनगड डोंगरावर आमदार बाळासाहेब थोरात, डॉ. सुधीर तांबे यांच्या उपस्थितीमध्ये या अभियानाच्या शुभारंभ होणार आहे. यावेळी आमदार सत्यजित तांबे, रणजितसिंह देशमुख, इंद्रजित थोरात, कॅन्सरतज्ञ डॉ. जयश्री थोरात, सोमेश्वर दिवटे, बाबा खरात, कार्यकारी संचालक जगन्नाथ घुगरकर व कृषी विभागाचे सर्व अधिकारी, कर्मचारी आदी उपस्थित राहणार आहे.
या कार्यक्रमासाठी जास्तीत जास्त नागरिकांनी उपस्थित राहावे असे आवाहन पेमगिरी ग्रामस्थ व दंडकारण्य अभियान समितीच्यावतीने करण्यात आले आहे.


