
बुधवार, १७ जुलै
पर्यावरण संवर्धन आणि वृक्षारोपण हे मानवतेचे काम आहे. ही वसुंधरा अधिक समृद्ध करण्यासाठी पर्यावरण व संवर्धनाच्या या लोक चळवळीत सर्वांनी सहभागी व्हावे, असे आवाहन करत सर्वांच्या सहभागामुळे दंडकारण्य अभियान ही पर्यावरण संवर्धनाची मोठी लोकचळवळ ठरली असल्याचे गौरवोद्गार माजी मंत्री, आमदार बाळासाहेब थोरात यांनी केले.
स्वातंत्र्य सेनानी सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात यांच्या संकल्पनेतून सुरू झालेल्या दंडकारण्य अभियानाचा १९ व्या वर्षाचा शुभारंभ आज पेमगिरीच्या चंदनगड येथून थोरात यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी अभियानाचे मुख्य प्रवर्तक माजी आमदार डॉ. सुधीर तांबे, दुर्गाताई तांबे, कॅन्सरतज्ञ डॉ. जयश्री थोरात, रणजीतसिंह देशमुख, कार्यकारी संचालक जगन्नाथ घुगरकर, अनिल थोरात, उपविभागीय वन अधिकारी संदीप पाटील, उपविभागीय कृषी अधिकारी गायकवाड, तालुका कृषी अधिकारी प्रवीण गोसावी आदींसह विविध संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते.
थोरात म्हणाले, २००६ मध्ये सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात यांनी दंडकारण्य अभियान सुरू केले. दरवर्षी कोट्यावधी बियांचे रोपण केले. लक्षावधी वृक्षांचे रोपण केले. कमी पाऊस आणि जास्त उन्हाळा यामुळे वृक्ष संवर्धनावर परिणाम होतो. मात्र तरीही मागील एकोणावीस वर्षांमध्ये तळेगाव भागासह उघडे बोडके डोंगर आता झाडांमुळे हिरवेगार दिसू लागले.
कोळवाडे येथील फादर हर्मन हिल, खांडगाव, पिंपळगाव कोंझिरा, चंदनापुरी, देवगड या ठिकाणांमधील डोंगरही वृक्षारोपणामुळे सहलीचे ठिकाणे ठरत आहेत. तालुक्यामध्ये वृक्ष संवर्धन संस्कृती वाढली आहे. झाडे जपणे ही आता लोकचळवळ झाली आहे.
डॉ. तांबे म्हणाले, आमदार थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली सहकारातील विविध संस्थांनी तालुक्यातील वेगवेगळे डोंगर निश्चित केले असून त्यावर वृक्षारोपण व संवर्धन सुरू आहे. सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात यांनी दिलेली ही पर्यावरण संवर्धनाची जबाबदारी आपल्या सर्वांना पुढे न्यायची आहे. यामध्ये विद्यार्थ्यांनी अधिक सहभाग घ्यावा असे आवाहन केले
दुर्गाताई तांबे म्हणाल्या, संगमनेर तालुका हा सह्याद्रीच्या पायथ्याशी असून तालुक्यातील विविध डोंगरांवर मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण केले आहे. आता डोंगर हिरवेगार दिसू लागल्याने संगमनेर तालुक्याची ओळख हरित तालुका म्हणून आगामी काळात होईल असा विश्वास व्यक्त केला.

निसर्गरम्य डोंगराच्या कुशीत विद्यार्थ्यांसह आषाढी एकादशी साजरी…
आषाढी एकादशीच्या निमित्ताने संगमनेर तालुक्यातील विविध पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी आमदार बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली सह्याद्रीच्या कुशीत असलेल्या हिरव्यागार डोंगरांच्या सानिध्यात पेमगिरी गावातील चंदनगड येथे वृक्ष संवर्धन दिंडी काढून विविध अभंग गात वृक्षारोपण केले. यावेळी विद्यार्थ्यांनी लेझीम पथक व पारंपारिक पोशाखात सादर केलेले नृत्य आणि गायलेली अभंग याचबरोबर पर्यावरण संवर्धनाची गीते यामुळे संपूर्ण वातावरण भक्तीमय झाले होते.

