गुरुवार १८ जुलै
शेत जमिनीचा फेरफार मंडल निरीक्षकांना सांगून प्रतिवादीच्या नावावर न करण्यासाठी पाच हजार रुपयांची लाच घेणे तलाठ्याच्या अंगलट आले आहे. अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयात तलाठ्याविरुद्ध आरोप सिद्ध झाल्याने न्यायालयाने विविध कलमांतर्गत अनुक्रमे तीन व दोन वर्ष कारावासाची आणि दंडाची शिक्षा ठोठावली आहे.
उत्तमराव पांडुरंग तांबे असे शिक्षा झालेल्या तलाठ्याचे नाव असून त्याच्या विरोधात उस्मानाबाद ग्रामीण पोलीस ठाण्यात गु.र.नं. १८/२०११ कलम ७, १३(१)(ड) सह १३(२) ला.प्र. अधिनियम, सन १९८८ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता.
लाच लुचपत विभागाच्या तत्कालीन पोलीस निरीक्षक श्रीमती अश्विनी भोसले यांनी या प्रकरणाचा तपास करत न्यायालयात आरोपी विरुद्ध आरोप पत्र दाखल केले होते. या खटल्याची सुनावणी धाराशिवचे अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश (क्र. १) राजेश गुप्ता यांच्यासमोर झाली. गुप्ता यांनी यासंदर्भात आज गुरुवारी निर्णय दिला.
या खटल्यातील तक्रारदाराचे शेत गट नं. १०२ क्षेत्र २ हेक्टर २ आर शेत जमिनीचा फेरफार प्रतिवादी वसंत नरवडे यांचे नावे मंडळ निरीक्षक यांना सांगुन न करण्यासाठी यातील धाराशिव तालुक्यातील आंबेवाडीसह अतिरिक्त कार्यभार असलेल्या कामेगाव, रुईभरचे तलाठी उत्तमराव पांडुरंग तांबे याने तक्रारदाराकडे पाच हजार रुपये लाचेची मागणी करून ती लाच पंचासमक्ष स्वीकारताना आरोपीला पकडण्यात आले होते.
न्यायालयात सरकार पक्षाच्या वतीने सरकारी वकील श्रीमती जोशी यांनी तर आरोपीच्यावतीने ॲड. मिलिंद पाटील यांनी काम बघितले. सरकार पक्षाचा आणि आरोपीच्या वकिलांचा युक्तिवाद ऐकल्यानंतर समोर आलेल्या पुरावे, साक्षींच्या आधारे न्यायाधीश राजेश गुप्ता यांनी आरोपीला दोषी ठरविले.
लाचखोर आरोपी उत्तमराव तांबे याला न्यायालयाने कलम ७ नुसार तीन वर्ष कारावास व दहा हजार रुपये दंड, दंड न भरल्यास पंधरा दिवस कारावास, कलम १३(१)(ड) व १३(२) नुसार दोन वर्ष कारावास व दहा हजार रुपये दंड, दंड न भरल्यास पंधरा दिवस कारावासाची शिक्षा ठोठावली.


