प्रवीण पुरो | मुंबई
महाविकास आघाडीचे विधान परिषदेचे उमेदवार शेकापचे आमदार जयंत पाटील यांच्या पराभवाला कारण ठरलेल्या काँग्रेसच्या सात फुटीर गद्दारांविरुद्ध निलंबनाची कारवाई करण्याच्या पक्षांतर्गत हालचाली सुरू झाल्या आहेत.
नुकत्याच झालेल्या विधान परिषदेचे निवडणुकीत काँग्रेसची मत फुटल्याचे समोर आले आहे. हे सगळे आमदार काँग्रेस पक्षाचे आहेत. फुटलेल्या सातही आमदारांची पक्षातून हकालपट्टी होणार असून त्यांना निलंबित करण्याची कारवाई दोन दिवसात होणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. येत्या दोन दिवसात मल्लिकार्जुन खर्गे आणि के. सी. वेणुगोपाल या कारवाईची घोषणा करणार आहेत.
विधानपरिषदेत निवडणुकीत ज्या आमदारांनी पक्षाच्या विरोधात जाऊन मतदान केलं आहे, त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली जात होती. त्यानंतर काँग्रेस पक्षाच्या राज्य कार्यकारिणीची महत्त्वाची बैठक झाली. या मागणीनंतर फुटीर आमदारांवर तात्काळ कारवाई होण्याची दाट शक्यता आहे. चंद्रकांत हांडोरे यांच्या निवडणुकीत मत फुटल्यानंतर या निवडणुकीत काँग्रेसने सावध भूमिका घेतली होती. या निवडणुकीत जे आमदार फुटलेले आहेत त्यांचे पुरावे काँग्रेसकडे असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. पक्षाला शिस्त लावण्यासाठी काँग्रेसचे हायकमांड कठोर कारवाई करणार आहे.
विधानपरिषद निवडणुकीत काँग्रेसची ही मतं अजित पवार यांच्या उमेदवाराला मिळाल्याने त्या उमेदवारांना ठरवून दिलेल्या कोट्यापेक्षा अधिक मते मिळाली. काँग्रेसने उमेदवार प्रज्ञा सातव यांना पहिल्या पसंतीची २८ मते दिली होती. या २८ पैकी ३ आमदारांनी सातव यांना मतदान न करता महायुतीच्या उमेदवाराला मतदान केल्याचे उघड झालं.
काँग्रेसने मिलिंद नार्वेकर यांना सहा मतं दिली होती. यातील एक मत फुटल्याचाही संशय व्यक्त केला जातोय. अशोक चव्हाण यांच्याबरोबर असलेले काही आमदार तसेच अन्य काही आमदारांची मतं फुटल्याचे उघड झालं. प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, विरोधी पक्षनेता विजय वडेट्टीवार, पृथ्वीराज चव्हाण यांनी मत फुटलेल्या संशयितांवर जाहीरपणे नाराजी व्यक्त केली होती.


