रविवार २१ जुलै
तालुक्यातील लाभार्थ्यांना यापूर्वी प्रकरणे करण्यासाठी होणारा त्रास, दलालांपासून मुक्ती, दरमहा खात्यावर पैसे जमा, सन्मानजनक वागणूक, अडचणी येणाऱ्याच्या पाठीशी उभे राहिल्यामुळे आज लोकांची ओढ वाढली असून, भाजपा व समितीचे काम उत्कृष्ट सुरू असल्यामुळे यशोधनला जाणाऱ्यांची संख्या घटल्यामुळे काही नेते व्यथित झाल्याचे संजय गांधी निराधार योजनेचे अध्यक्ष अमोल खताळ यांनी म्हटले आहे.
पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांनी दि. १० मार्च २०२४ रोजी जिल्हाधिकाऱ्यांना संजय गांधी निराधार योजना समिती अशासकीय सदस्य नियुक्तीबाबत शिफारस केली होती. परंतु लोकसभा, शिक्षक विधानपरिषद निवडणुक आचारसंहिता सुरु झाल्याने समिती नियुक्ती प्रलंबित राहिली होती. आचार संहिता संपल्यानंतर समिती अध्यक्ष अमोल खताळ यांनी जिल्हाधिकाऱ्यांना भेटून समिती तात्काळ जाहीर करण्याची विनंती केली केली. पाठोपाठ जिल्हाधिकाऱ्यांनी ११ जुलैला समिती नियुक्ती जाहीर केली.
अशासकीय सदस्य नियुक्ती झाल्यानंतर अध्यक्ष खताळ यांनी तहसिलदार यांच्याशी चर्चा करून १३ जुलै रोजीच पत्र काढून बैठक १८ जुलैला घेण्याचे ठरविले होते. अध्यक्ष, समिती सर्व सदस्य, तहसिलदार बैठक सुरु झाल्यानंतर आमदाराची मुलगी निवेदन देण्यासाठी तहसिल कार्यालयात आली असता बैठक सुरु असल्याने तहसिलदार यांनी नायब तहसिलदार यांना निवेदन स्वीकारण्यास सांगितले. परंतु तहसीलदारांनीच निवेदन स्वीकारावे असा हट्ट त्यांनी धरला, अर्धा तास थांबावे लागल्याचे दु:ख झाल्याच्या नैराश्यातून आमदाराच्या भावाने पत्रक काढून प्रशासकीय दिरंगाईच्या नावाखाली राजकीय संधी साधण्याचा केविलवाणा प्रयत्न केला व बैठक आमच्यामुळेच झाली असे भासविण्याचा पराक्रम केला.
महायुती व पालकमंत्री विखे पाटील यांच्या माध्यमातून संजय गांधी निराधार योजनाचे काम लोकाभिमुख, पारदर्शी सुरू असून माझी नियुक्ती झाल्यापासून विखे यांच्या सूचनेनुसार योजनेचे प्रकरण मंजूर करताना राजकीय निकष न लावता शोषित, पिडीत, वंचित घटकांना न्याय देण्याचे काम आम्ही करत आहे. स्थानिक आमदार मंत्री असताना त्यांच्या कालावधीमध्ये सहा सहा महिने लाभार्थ्यांच्या खात्यावर पैसे वर्ग होत नव्हते. विखे यांच्यामुळे दरमहा पाच तारखेच्या आत प्रत्येक लाभार्थ्याच्या खात्यावर पैसे जमा होत असल्याने ग्रामीण भागात समाधानाचे वातावरण असते. लाभार्थ्यांना पालकमंत्री विखे पाटील यांच्या हस्ते मंजुरी आदेश देणार असल्याचे खताळ यांनी म्हटले आहे.


