रविवार २१ जुलै
लोकनेते आमदार बाळासाहेब थोरात जनतेच्या विकासासाठी सातत्याने काम करत आहे. मात्र नव्याने पुढारी होऊ पाहणारे काही लोक फक्त पत्रकबाजी करत आहेत. अनेक दिवस संजय गांधी निराधार योजनेच्या बैठका रखडल्याने गोरगरिबांची प्रकरणे प्रलंबित होती ती तात्काळ मार्गी लागावी यासाठी आमदार थोरात यांनी जिल्हाधिकाऱ्यांना फोन केल्यानेच या समितीच्या बैठका झाल्या. लाभार्थ्यांचे अडवणूक करणाऱ्यांसाठी ही मोठी चपराक होती, याच पोटदुखीतून ते पत्रकबाजी करत असल्याचे टिका काँग्रेसचे शहराध्यक्ष निखिल पापडेजा यांनी केली आहे.
थोरात यांनी संजय गांधी निराधार योजनेच्या संदर्भात जिल्हाधिकाऱ्यांना फोन केल्यानंतर या समितीच्या बैठका घेण्याच्या आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी तहसीलदारांना दिले होते. त्यानंतर समितीची बैठक पार पडली. मात्र या बैठकीवरून राजकारण रंगले आहे. पत्रकबाजी करणाऱ्यांनी त्यांचे एक तरी काम दाखवावे, किंवा सामाजिक कामातील योगदान दाखवावे असे आव्हान देत भाजपच्या खोट्या पत्रकबाजीला संगमनेरकर जनता भूलणार नसल्याचे पापडेजा यांनी म्हटले आहे.
काँग्रेस पक्षाचे नेते आमदार बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली संगमनेर तालुका हा विकासाचे मॉडेल म्हणून ओळखला जातो. गोरगरिबांच्या विकासासाठी आमदार थोरात यांनी यशोधन कार्यालयातील जनसेवकांच्या मार्फत वाडी-वस्तीवर विकासाच्या योजना राबवल्या या पात्र लाभार्थींना शासकीय योजनांचा लाभ मिळावा, यासाठी सर्व फॉर्मची पूर्तता करून सदर फॉर्मही तहसील कार्यालयात जमा केले. मात्र फक्त पक्षपातीपणा आणि राजकारणासाठी अनेक दिवस सध्याचे सत्ताधारी आणि प्रशासन यांच्याकडून संजय गांधी निराधार योजनेची बैठक रखडवली गेली. यामुळे याचा त्रास गोरगरिबांना झाला.
अनेक नागरिकांनी तक्रारी केल्यानंतर काँग्रेस पक्षाचे नेते आमदार थोरात यांनी थेट जिल्हाधिकाऱ्यांना फोन लावून सदर बैठका तातडीने घेण्याच्या सूचना दिल्या. आमदार थोरात हे वरिष्ठ नेते असून विधानसभेतील सर्वात ज्येष्ठ आमदार आहेत त्याचा सन्मान राखत जिल्हाधिकाऱ्यांनी तातडीने संगमनेर तहसीलदार यांना संजय गांधी निराधार योजनेच्या बैठक घेण्याचे निर्देश दिले. त्यातून योग्य लाभार्थींना लाभ मिळणार असल्याने अनेक नागरिकांमध्ये आनंद निर्माण झाला.
मात्र गोरगरिबांच्या योजनांमध्येही दडपशाही आणि राजकीय फायदा पाहणाऱ्या भाजपच्या सत्ताधारी मंडळींनी अनेक दिवस ही कामे रखडवली. आमदार थोरात यांच्या प्रयत्नातून आणि फोनमुळे बैठक होऊन गरिबांना लाभ मिळत आहे. त्याचा भाजपला कोणताही फायदा होणार नसल्याने ते लोक काहीतरी खोटी पत्रकबाजी करत आहेत. त्यांच्या पत्रक बाजीला सुजान संगमनेरकर कधीही भुलणार नाही, असेही पापडेजा यांनी म्हटले आहे.


