सोमवार, २२ जुलै
शरद पवार हे देशातील भ्रष्टाचाऱ्यांचे सर्वात मोठे सरदार असून त्यांनीच भ्रष्टाचाराला राजाश्रय दिल्याचा गंभीर आरोप करत उद्धव ठाकरे औरंगजेब फॅन क्लबचे नेते असल्याचे सांगत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी पवार आणि उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला.
केंद्रीय गृहमंत्री शहा भाजपाच्या पुण्यात झालेल्या कार्यकर्ता मेळाव्यात बोलत होते. महाराष्ट्रात कधी नव्हे एवढा मोठा विजय यावेळी भाजप युतीचा होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. तर शरद पवार यांच्यावर टीकेची झोड उठवितांना म्हणाले, पवार केंद्रात मंत्री होते, राज्यात त्यांचे सरकार होते त्यावेळी त्यांनी काय केले? असा प्रश्न उपस्थित करत केंद्राकडून मोठा निधी कधीही पवारांनी महाराष्ट्रासाठी आणला नाही, उलट मोदींनी खूप मोठा निधी गेल्या दहा वर्षात महाराष्ट्राला दिला.
शरद पवार नेहमी खोटे बोलतात. ते आमच्यावर भ्रष्टाचाराच्या आरोप करतात, पण या देशात भ्रष्टाचाऱ्यांचे सरदार जर कोणी असेल तर ते शरद पवार आहेत, त्यामुळे महाराष्ट्रातली जनता पवारांना कधीही संधी देणार नाही. पवारांनी जनतेला फक्त खोटी आश्वासने दिली. त्यांचा पडदाफाश केल्याशिवाय राहणार नाही, असेही शहा म्हणाले.
मराठा आरक्षणाच्या मुद्द्याला हात घालत मराठा समाजाला आरक्षण देण्याचे काम देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने केले होते. ज्यावेळी महाराष्ट्रात भाजपाचे सरकार येते त्यावेळी मराठा समाजाला आरक्षण मिळते. पण ज्यावेळी शरद पवारांचे सरकार येते त्यावेळी मराठा समाजाचे आरक्षण निघून जाते. त्यामुळे मराठा समाजाचे आरक्षण टिकवणारे सरकार हवे की नको असा प्रश्न शहा यांनी यावेळी विचारला.
पवारांवर टीका करतानाच शहा यांनी उद्धव ठाकरे यांना देखील लक्ष्य केले. औरंगजेब फॅन क्लब तुम्हाला माहिती आहे का असा प्रश्न कार्यकर्त्यांना उपस्थित करत हा आघाडीचा क्लब आहे. त्यांचा नेता कोण आहे माहित आहे का असा प्रतिप्रश्न करत त्यांचा नेता उद्धव ठाकरे असल्याचे ते म्हणाले. जे लोक कसाबला बिर्याणी देतात त्यांच्या मांडीला मांडी लावून उद्धव ठाकरे बसले आहेत. तेच स्वतःला बाळासाहेबांचे वारस समजतात. जे आज काँग्रेस बरोबर आहे, याची उद्धव ठाकरे यांना लाज वाटायला हवी असे सांगत हा औरंगजेब फॅन क्लब महाराष्ट्राला सुरक्षित ठेवू शकत नसून महाराष्ट्राला फक्त भाजप सुरक्षित ठेवू शकणार असल्याचा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.
विधानसभा निवडणुकीत राज्यात आत्तापर्यंतचा सर्वात मोठा विजय यावेळी भाजपला मिळणार असल्याचे सांगत निवडणुकीनंतर महायुतीचे सरकार निश्चित बनेल. लाडकी बहीण सारखी योजना सरकारने आणली आहे. याशिवाय अनेक योजना सरकारकडून राबविल्या जात आहे. लोकसभेला जी कसर राहिली ती विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने भरून काढा असे आवाहन त्यांनी कार्यकर्त्यांना केले.


