मंगळवार, २३ जुलै
महिलेसोबत अनैतिक संबंध असल्याच्या संशयातून रविवारी रात्री तरुणाची हत्या करण्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी अहमदनगर जिल्ह्यातील कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात सहा जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून तिघाजणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
दरम्यान सोमवारी आरोपींच्या अटकेच्या मागणीसाठी मोठा जमाव कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात जमला होता. मिळालेल्या माहितीनुसार कोपरगाव शहरात महिलेसोबत असलेल्या अनैतिक संबंधाच्या संशयावरून सोहेल हरून पटेल (वय २८ वर्षे, रा. आयशा कॉलनी, कोपरगाव) या तरुणाचे अपहरण करून त्याला मारहाण करत हत्या केल्याचा आरोप सोहेल पटेलच्या कुटुंबियांनी केला आहे.
या संदर्भात मयत सोहेलचा भाऊ शाहरुख खान पटेल याने शहर पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम १०३(१), ११८(१)(२), १४०(१), १८९(१), १९१(३), १९१(२) व १९० नुसार सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शाहरुख पटेल याने आपल्या फिर्यादीत म्हटले आहे की, सोहेल पटेल याचे एका महिलेचे अनैतिक संबंध असल्याच्या कारणावरून आरोपी मच्छिंद्र सोनवणे उर्फ मच्छू, स्वप्निल गायकवाड, महेश कट्टे, विकी परदेशी, योगेश जाधव उर्फ पोंग्या व विकीचा मित्र (सर्व रा. कोपरगाव) यांनी घरी येऊन सोहेलला (MH 15 E 4795) या क्रमांकाच्या वाहनातून घेऊन गेले त्याला कर्मवीर नगरमध्ये जावेद जमशेद शेख यांच्या शेती प्लॉटमध्ये नेऊन लाकडी दांड्याने, चाकूने, खिळे असलेल्या बांबूने मारहाण केली. यात सोहेलचा मृत्यू झाला.
खुनाच्या घटनेनंतर सकाळी कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात मोठा जमाव जमला होता. या जमावाने आरोपींना अटक करण्याची मागणी केली. श्रीरामपूर विभागाचे अप्पर पोलीस अधीक्षक दत्तात्रय कलबुर्मे, डीवायएसपी शिरीष वमने यांनी कोपरगावमध्ये येत जमावाला कारवाईचे आश्वासन देत शांत केले. तसेच या प्रकरणी तीन आरोपींना अटक केले असून उर्वरित आरोपींना लवकरच ताब्यात घेतले जाईल असे सांगितले.


