गुरुवार, २५ जुलै
नागरिकांना मूलभूत गरजांची पूर्तता करून देणे हे स्थानिक स्वराज्य संस्थेचे मुख्य काम आहे. मात्र शहरालगत असलेल्या घुलेवाडीतील कानिफनाथ मंदिराच्या पाठीमागे असलेल्या नवश्याचा मळा येथील ग्रामस्थांना वेगळाच अनुभव येत असून मूलभूत गरजांसाठी त्यांना रस्त्यावर येण्याची वेळ आली आहे.
या भागातील नागरिक केल्या वीस वर्षापासून सातत्याने ग्रामपंचायतीकडे रस्ता पाणी आणि वीज या संदर्भात पाठपुरावा करत आहे. ग्रामपंचायत या नागरिकांकडून आवश्यक कर घेत असली तरी त्यांना सुविधा देण्यास मात्र असमर्थ ठरली आहे. त्यामुळे नागरिकांनी आता ग्रामपंचायत प्रशासनाला शेवटचा इशारा देत एक महिन्याची मुदत दिली आहे. या मुदतीत जर ग्रामपंचायतीने काम हाती घेतले नाही तर संघर्ष सेवा समितीच्या माध्यमातून आंदोलन उभे करण्याचा इशारा दिला आहे.
काय आहे नेमकी मागणी…
वारंवार मागणी करून देखील ग्रामपंचायतने नागरिकांची कोणतीही मागणी अद्यापपर्यंत पूर्ण केली नाही. या परिसरात एक चांगला रस्ता रेड लाइट आणि चांगले पाणी दिले जावे एवढेच माफक अपेक्षा या परिसरातील नागरिकांची आहे. ग्रामपंचायतला आवश्यक ते सर्व कर आम्ही देत आहोत, मात्र संविधान पासून आम्ही वंचित आहोत. सुविधा मिळाव्यात यासाठी हतबल झालेल्या नागरिकांनी आता शेवटचा इशारा ग्रामपंचायत प्रशासनाला दिला आहे. त्यानंतर तीव्र आंदोलन उभे केले जाणार आहे.
सुविधांपासून वंचित असलेल्या नागरिकांचा संयम सुटल्याने त्यांनी आता ग्रामपंचायतीसह निवेदनाच्या प्रती राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, सार्वजनिक बांधकाम मंत्री, अहमदनगरचे जिल्हाधिकारी, संगमनेरचे प्रांताधिकारी आणि तहसीलदारांना पाठवत असल्याचे सांगितले आहे.


