रविवार, २८ जुलै – अहमदनगर
जीवन एक तडजोड आहे. आपल्या आयुष्यात प्रत्येकाने तडजोड करायला शिकले पाहिजे. आप आपसात तडजोड करून जास्तीत जास्त वादातील प्रकरणी मिटविले पाहिजे. लोक अदालत मध्ये ग्रामपंचायत, जिल्हा परिषद, महसूल, वीज वितरण, बँका, पतसंस्था, इन्शुरन्स कंपनीचा सहभाग असतो. त्यामुळे लोक अदालत हा एक महायज्ञ असून त्यामध्ये प्रत्येकाने आपले योगदान दिले पाहिजे, असे प्रतिपादन अहमदनगरचे प्रमुख जिल्हा न्यायाधीश सुधाकर यार्लगड्डा यांनी केले.
जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, अहमदनगर बार असोसिएशन आणि सेंट्रल बँक असोसिएशनच्यावतीने शनिवारी (२७ जुलै) आयोजित केलेल्या लोक अदालतीचे उद्घाटन न्यायाधीश सुधाकर यार्लगड्डा यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ते बोलत होते.
निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र पाटील, अतिरिक्त पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे, जिल्हा सरकारी वकील सतीश पाटील, बार असोसिएशनचे अध्यक्ष नरेश गुगळे, पोलीस उपाधीक्षक हरीश खेडकर, अॅड. भूषण बोऱ्हाटे, अॅड. विक्रम वाडेकर, अॅड. सागर पादीर, अॅड. राजाभाऊ शिर्के, अॅड. पिंटू पाटोळे, अॅड. अंधारे, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण सचिव भाग्यश्री पाटील आदी उपस्थित होते.
अॅड. नरेश गुगळे म्हणाले, जी प्रकरणे समोपचाराने मिटवण्यासारखे आहेत, ती प्रकरणे लोक अदालतमध्ये मिटवावीत. सामान्य लोकांनी वेळ व दिवस वाया न घालवता ही प्रकरणे जास्तीत जास्त मिटवून त्याचा फायदा घ्यावा.
प्रास्ताविक जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या सचिव भाग्यश्री पाटील यांनी केले. सूत्रसंचालन अॅड. वृषाली तांदळे यांनी तर, अॅड. सुनील मुंदडा यांनी आभार मानले.


