मंगळवार, ३० जुलै
सर्वत्र डिजेला बंदी आहे, तरीही संगमनेरमध्ये जमिनीला हादरे देणारे कर्णकर्कश आवाजाचे डीजे सर्रासपणे दणदणाट करत आहे. बंदी असलेल्या या डीजेच्या आवाज बंद करण्याची मागणी संगमनेरमधील जेष्ठ नागरिकांनी पोलीस उपाधीक्षक सोमनाथ वाकचौरे यांना दिलेल्या निवेदनात केली आहे.
राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह पोलीस अधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात ज्येष्ठ नागरिकांनी म्हटले आहे की, शहर व तालुक्यातील अनेक गावात डीजेचा दणदणात सुरू असल्याने त्याच्या कर्कश आवाजाने नागरिकांचे आरोग्य बिघडत चालले आहे. लहान मुले, आजारी असलेले नागरिक यामुळे त्रस्त झाले आहे.
सरकारने ध्वनी प्रदूषणाच्या बाबतीत कायदा करून देखील सर्व नियम धाब्यावर बसवून परिसरात डीजेचा कर्कश आवाज ऐकू येतो. कोणत्या एखाद्या उत्सवाची मिरवणूक असेल, कोण्या सोकाजी टोकाजीचे वाढदिवस असतील, कोणाचे वरात असेल, कोणाचे लग्न असेल, कोणाची मिरवणूक असेल, सर्वच धर्माचे उत्सव असतील, एवढेच काय एखाद्या दुकानाचे उद्घाटन असेल किंवा इतर कोणतेही कार्यक्रम असतील तर त्यात डीजे वाजवून सर्रासपणे मोठ्या प्रमाणात ध्वनी प्रदूषण केले जाते.
रात्री दहा वाजेपर्यंत परवानगी असताना मध्यरात्री बारा-एक वाजेपर्यंत डीजे वाजविला जातो. संबंधित अधिकारी, राजकीय सामाजिक पदाधिकारी यांना सांगण्याची सोय उरली नाही याच्यापासून आवाज कमी करा अशी तक्रार केल्यास तक्रारदारच गुन्हेगार ठरतो. अशी अनेक उदाहरणे पहावयास मिळत आहे.
आम्ही ज्येष्ठ नागरिक असल्याने आम्हाला देखील सर्व कार्यक्रमात व उत्सवात सहभाग घेण्याचे इच्छा असते, परंतु डीजेचा दणदणाट आणि कर्णकर्कश आवाज यामुळे सहभाग घेता येत नाही. अनेक ज्येष्ठ नागरिकांना शुगर, ब्लड प्रेशर, हृदयाचे आजार असल्याने या आवाजाचा धोका निर्माण होतो. गेल्या वर्षी गणेशोत्सव मिरवणुकीत डीजे वाजविला जाणार नाही अशा सूचना जिल्ह्याच्या अधिकाऱ्यांनी दिल्या होत्या, मात्र नंतर वरिष्ठ अधिकाऱ्यांनीच शांतता समितीच्या बैठकीत डीजे वाजवण्यास परवानगी दिली जाईल असे घोषित केल्याने लोक अचंबित झाले होते. आगामी गणेशोत्सव समोर येऊन ठेपला असल्याने या पार्श्वभूमीवर हे निवेदन देण्यात आले आहे.
ध्वनी प्रदूषणाचे नियम धाब्यावर बसून नागरिकांच्या जीवाशी कोणी खेळत असेल तर आम्ही जेष्ठ नागरिक म्हणून ते खपवून घेणार नाही. डीजेचा कर्कश आवाज व दणदणाट बंद न झाल्यास नाईलाजास्तव आम्हाला सरकारविरुद्ध तीव्र आंदोलन करावे लागेल. कायदे व नियम जर अधिकारी, पदाधिकारी मोडत असतील तर याची गंभीर दखल घ्यावी व आमच्यासारख्या जेष्ठ नागरिकांना देखील सर्व उत्सव कार्यक्रमात सहभाग घेता येईल याची काळजी घ्यावी. असे या निवेदनात म्हटले आहे.
यांनी दिले निवेदन…
ज्ञानेश्वर गायकर, शशिकांत घोलप, दिलीप पवार, प्राचार्य सहदेव चौधरी, वि. द. जोशी, कैलास वाकचौरे, मनोहर देशपांडे, मधुकर कोळपकर, द. सा. रसाळ, अविनाश जगदाळे, सतीश घबाडे, शोभा काळे, मालती गोरडे, स्मिता देशमुख, शोभा कोळपकर, कमल दिघे, प्रमिला जाधव, नंदकिशोर बेल्हेकर आदींचा समावेश आहे.


