जीएसटीमधून मिळणारा पैसा हा सरकारचा पैसा नसून तो सामान्य गोरगरिबांचा: डॉ. तांबे
दक्षिणमध्ये जनतेने चांगली दमछाक केली. लोकांनी आराम करण्यासाठी वेळ दिला. आता कुटुंबाला वेळ द्या: प्रभावती घोगरे
हुकूमशाहीचा राजकारणामुळे संपूर्ण तालुका अस्वस्थ: डॉ. पिपाडा
शुक्रवार, ०२ ऑगस्ट
आश्वी परिसरातील गावांमध्ये मोठी दहशत आहे. विरोधी गावचा सरपंच असेल अथवा ग्रामपंचायत सदस्य असेल तर त्याचे पद घालविण्याचा प्रयत्न आपण कधी केला नाही. आता या उलट परिस्थिती असून विरोधी सरपंच आहे, म्हणून पिण्याच्या पाण्यापर्यंत राजकारणाचे विष नेऊन ठेवले आहे. पाणी योजना बंद पाडली जाते. मात्र माणसाला प्यायला पाणी देण्याच्या योजनेतही जेव्हा माणसं विष कालवतात तेव्हा अशा लोकांना माणसं विसरत नाही, जिरवाजिरवी आणि दमदाटीचे राजकारण फार काळ चालत नसल्याचा सुचक इशारा नाव न घेता राज्याचे माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी विद्यमान महसूल मंत्र्यांना दिला.
शिर्डी विधानसभा मतदारसंघातील आणि संगमनेर तालुक्यातील आश्वी बुद्रुक येथे एका कार्यक्रमात माजी मंत्री आमदार बाळासाहेब थोरात बोलत होते. माजी आमदार डॉ. सुधीर तांबे अध्यक्षस्थानी होते. भारतीय जनता पक्षाचे नेते डॉ. राजेंद्र पिपाडा, कृषी भूषण प्रभावती घोगरे, डॉ. जयश्री थोरात यांच्यासह विविध संस्थांचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.
थोरात म्हणाले, आपण कधीही चुकीचे अथवा बदला घेण्याचे राजकारण केले नाही. सर्वांना बरोबर घेत विकासाचे राजकारण केले. त्यामुळे जनता सातत्याने आपल्या सोबत आहे. विकास कामांमध्ये देखील कधीही भेदभाव केला नाही. विरोधकांचीदेखील कामे केली. गत अडीच वर्षाच्या काळात या परिसरातील अनेक पाणी योजना मंजूर करतांना त्यासाठी पाठपुरावा देखील केला.
याउलट स्थिती या मतदारसंघात असून परिसरात मोठे दहशत आहे. दहा वर्ष गणेश कारखाना यांच्या ताब्यात असताना देखील त्यांना तो चालविता आला नाही. राहुरीचे तसेच झाले. यांना मात्र एकच कारखाना चालवायचा होता, असे स्पष्ट करत आमचा उद्देश आणि भावना चांगली असून आमच्या कार्यकाळात गणेश कारखाना अतिशय चांगला चालला आहे, मात्र त्यामध्ये देखील अडचणी निर्माण करण्याचे काम सत्ताधारी करत आहेत. सत्तेचा गर्व जनतेने उतरविला आहे. गोरगरिबांच्या प्रपंचासोबत खेळू नका असा इशारा देतानाच संगमनेर प्रमाणेच राहता आणि शिर्डीमध्येही चांगले वातावरण निर्माण करणार असल्याचे थोरात म्हणाले.
माजी आमदार तांबे म्हणाले, भाजप सरकारने जनतेला अनेक भुलथापा दिल्या, मात्र जनतेने त्यांचा बुरखा फाडला आहे. अगदी आयोध्यामध्येसुद्धा त्यांचा पराभव झाला. जीएसटीमधून मिळणारा पैसा हा सरकारचा पैसा नसून तो सामान्य गोरगरिबांचा पैसा आहे. येणाऱ्या काळात महाविकास आघाडीच्या पाठीमागे उभे राहण्याचे आवाहन त्यांनी केले.
प्रभावती घोगरे म्हणाल्या, संगमनेरमध्ये शांतता, सुसंस्कृतपणा आणि विकासाचे राजकारण आहे. मात्र आमच्या राहाता तालुक्यात दडपशाही आणि हुकूमशाही सुरू असून हम करे सो कायदा निर्माण झाला आहे. शेतकऱ्यांच्या मालाला हमीभाव नाही दुधाला भाव नाही. मात्र पाण्याची बाटली महाग आहे, अशा प्रवरेच्या नेत्यांनी गोरगरिबांना देवच आठवायला लावला असून जनता आता जागृत झाली आहे. या दडपशाही विरुद्ध आवाज उठवला जाईल. नगर लोकसभा मतदारसंघात पराभूत झालेले उमेदवार आता संगमनेरमध्ये उभे राहण्याची बतावणी करत आहे. अरे बाबा, नगर दक्षिणमध्ये जनतेने चांगली दमछाक केली. लोकांनी आराम करण्यासाठी वेळ दिला. आता कुटुंबाला वेळ द्या. वाटलं तर व्यवसाय करा, असा मिश्किल टोलादेखील त्यांनी डॉ. सुजय विखे यांना लगावला.
डॉ. राजेंद्र पिपाडा म्हणाले, राहता तालुक्यामध्ये विनयभंग, ॲट्रॉसिटी सारख्या खोट्या केसेस आपण केल्या जात आहे. अत्यंत दडपशाहीचे राजकारण तालुक्यात सुरू आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावरूनही राजकारण केले गेले. या हुकूमशाहीचा राजकारणामुळे संपूर्ण तालुका अस्वस्थ आहे. यासंदर्भात आपण भाजपच्या वरिष्ठ नेत्यांकडे येथील नेतृत्वाची तक्रार करणार आहोत, असे ते म्हणाले.


