विशेष लेख…
३ ऑगस्ट या दिवशी राष्ट्रीय अवयव दान दिवस साजरा केला जातो. याच दिवशी देशातील पहिली हृदय प्रत्यारोपण शस्त्रक्रिया करण्यात आली होती. याचे आठवण म्हणून २०१० पासून हा दिवस राष्ट्रीय अवयव दान दिवस म्हणून साजरा केला जातो.
एखाद्याला नवीन जीवन देण्यासाठी अवयवदान करने हा एक उदात्य मार्ग असु शकतो. अवयवदान दिनानिमित्त आपण जागरूकता वाढवूया आणि अधिकाधिक लोकांना अवयवदाता म्हणून नोंदणी करण्यासाठी प्रोत्साहित करूया एका अवयवदात्यामुळे आठ पेक्षा अधिक लोकांना याचा उपयोग होतो. अवयवदानाच्या माध्यमातून आपले मौल्यवान अवयव दान करण्याचा संकल्प करण्याची आणि पुढे येण्याची संधी आपल्या सर्वांना आहे.
अवयवदान जागृती वाढल्याने अधिकाधिक लोकांना अवयवदान करण्यास प्रोत्साहन मिळू शकते, अवयवदानाचे मुख्यत: जिवंतपणी, मृत्यू शय्येवर व मृत्यूनंतर असे प्रकार पडतात.
जिवंतपणी अवयवदान :- जिवंत अवयवदान ही एक अवयव प्रत्यारोपण प्रक्रिया आहे. ज्यामध्ये जीवंत व्यक्ती एक मूत्रपिंड, यकृताचा एक भाग, स्वादुपिंडाचा एक भाग दान करू शकते.
मृत्यू शय्येवरील अवयवदान दान :- ज्यावेळी एखाद्या रुग्णाला डॉक्टर ब्रँनडेड म्हणून घोषित करतात तेव्हा त्याच्या शरीरातील हृदय, किडनी, यकृत, फुफुस, लहान व मोठी आतडे, स्वादुपिंड, डोळे, हाडे, त्वचा इत्यादी अवयव दान करता येतात
मृत्यूनंतर अवयवदान :- मृत्यू नंतर नेत्रदान, त्वचादान, देहदान करता येते.
आज अनेकांना अवयवादानाची आवश्यकता आहे. प्रत्येक दिवशी शेवटच्या टप्प्यातील अवयव निकामी झालेल्या रुग्णाच्या अवयवाची दुसरे रुग्ण वाट पाहत आहे. मात्र त्यांना वेळेत अवयव उपलब्ध होत नसल्याने त्यांचा मृत्यू होत आहे. आल्यावर दानाची प्रतीक्षा यादी वाढत आहे. आपला देश आजही अवयव प्रत्यारोपणासाठी नात्यांच्या आणि अवयवाच्या कमतरतेशी झगडत आहे.
आपल्या देशात हृदय प्रत्यारोपणाची परिस्थिती अधिक वाईट आहे, क्षमता असूनही जीव वाचवू न शकणे ही जीवनाचे सर्वात वाईट शोकांतिका आहे. अवयव दाना विषयी आजही अनेक गैरसमज समाजात पसरले असून त्यातला सर्वात मोठा गैरसमज म्हणजे या क्षेत्रात काम करणाऱ्या संस्था अवयवांचा काळाबाजार करतात.
मात्र प्रत्यक्षात हे लक्षात घेणं गरजेचं आहे की, या क्षेत्रात काम करणाऱ्या संस्था अवयव दान संबंधित कायदा अंतर्गत असलेल्या आंतरराष्ट्रीय मार्गदर्शक तत्त्वानुसार काम करतात. NOTTO, SOTTO, ROTTO, ZTCC यांचं नियंत्रण या सर्वांवर असते.
अवयवदानाचा फॉर्म भरल्यानंतर संबंधित संस्था किंवा शासनाच्या वेबसाईटवर फॉर्म भरला तरीदेखील त्यांना डोनरकार्ड देण्यात येते ते त्यांनी कायम जवळ बाळगायच असते. जर फॉर्म भरला नसेल तरीदेखील मृत्यूनंतर जवळच्या नातेवाईकांच्या संमतीने अवयवदान करता येते.
अवयवदान व देहदान या दोन्ही भिन्न प्रक्रिया असून हृदय, फुफुस, लहान आतडे इत्यादी अवयव फक्त मृत्यू शय्येवर असताना व डॉक्टरानी ब्रेनण्डेड घोषित केल्यावर करता येतात मृत्यूनंतर फक्त त्वचा व नेत्रदान तसेच देहदान करता येते. भाजलेल्या रुग्णांना त्वचा मिळाल्यास त्यांची जखम लवकर बरी होते. तसेच नेत्रदानामुळे कोर्निया खराब झाल्यामुळे ज्यांची दृष्टी गेली अशांना नवीन दृष्टी कोर्नियल ट्रेसप्लान्टमुळे येते.
तामिळनाडू राज्य अवयवदानात पहिल्या क्रमांकावर असून तेथील सरकारने अवयवदान करणाऱ्यांचे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येतील असदेखील जाहीर केलं आहे. श्रीलंका हा देश अवयवदानात सर्वांत पुढे आहे, कारण तेथे अवयवदान ही राष्ट्रीय संपत्ती जाहीर केली आहे. मृत्यूनंतर सहा तासांच्या आत नेत्रदान करता येते. नेत्रदान करून अनेकांच्या जीवनातील अंधकार दूर होऊ शकतो. अवयवदान दान ही परंपरा बनावी व जास्तीत जास्त लोकांपर्यंत ही माहिती पोहचवून अवयवदानात आपला देश पुढे कसा राहील यासाठी आजच्या दिवशी अवयवदानाचा फॉर्म भरून संकल्प करू या!
डॉ. अशोक जी. गावित्रे, अवयवदान समुपदेशक.
(भ्रमणध्वनी – ७९७२६७७७८१)


