शनिवार, ०३ ऑगस्ट
संगमनेरमध्ये सुरू असलेल्या अवैध धंद्याच्या माध्यमातून अनेक जण गुन्हेगारीकडे वळत आहे. मोठ्या प्रमाणात अवैध धंदे वाढीस लागल्याने हे धंदे बंद न केल्यास रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याचा इशारा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) चे शहराध्यक्ष कैलास कासार यांनी दिला आहे.
संगमनेर शहराच्या अनेक भागात गल्लोगल्ली मटक्याची दुकाने थाटली गेली आहे. याशिवाय अनेक प्रकारचे अवैध धंदे करणाऱ्या व्यावसायिकांचा रस्त्यावर आता नागरिकांना देखील त्रास होऊ लागला आहे. बहुचर्चित ठरलेल्या शक्तिमान टॉवर्समध्ये देखील अनेक अवैध धंदे करणाऱ्या व्यावसायिकांनी आपले दुकाने सुरू केले असून पोलीस यंत्रणाच्या नजरेसमोर हे सर्व अवैध धंदे सुरू आहेत.
मटका, गुटखा, जुगार, गांजा विक्री, गांजाची सिगारेट, उत्तेजक औषधी द्रव्य, बनावट दारू, लोटो, बिंगो, अवैध कॅफे हाऊस, भंगार दुकाने, गोवंश कत्तलखाने, वाळू तस्करी अशा अवैध व्यवसायांचा सुळसुळाट झाला असून दुचाकी चोऱ्या, मंगळसूत्र गंठण, दागिने, चोऱ्यात दिवसेंदिवस वाढ होत आहे. यामुळे संगमनेरचे स्वास्थ्य बिघडत असून गुन्हेगारीत वाढ होत आहे. यातून शहरात अनुचित प्रकार घडण्याचे शक्यता देखील नाकारता येत नाही.
माध्यमातून देखील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्यांकडे कारवाई करणाऱ्या संबंधित यंत्रणांकडून दुर्लक्ष केले जाते. त्यामुळे कालांतराने या बातम्या देखील येण्याचे बंद होते. अनेक वेळा तक्रारी करून देखील पोलीस प्रशासनाकडून समाधानकारक उत्तर मिळत नाहीत. प्रशासनाने या अवैध धंद्यांवर कारवाई करत हे धंदे बंद करावेत अन्यथा यासाठी आम्हाला रस्त्यावर उतरून तीव्र स्वरूपाचे आंदोलन करावे लागेल, असे आरपीआयचे शहराध्यक्ष कैलास कासार यांनी म्हटले आहे.


