
महाराष्ट्राच्या राजकारणात अत्यंत गलिच्छ पातळी गाठणार्या भाजपला धक्क्यावर धक्के बसूनही त्या पक्षाचे नेते सुधारण्याचं नाव घेत नाहीएत. या घाणेरड्या राजकारणाचे फटके लोकसभेत पडले तरी हे नेते पक्षाला खड्ड्यात घालण्याची एकही संधी सोडत नाहीत, हे अनिल देशमुख यांच्यावरील कथित पलटवाराने दाखवून दिलं आहे. राज्यात गेल्या दहा वर्षातील राजकीय उलथापालथीचं केंद्र हे भाजपच होतं आणि आहे. या घटनांमागे असलेल्या अनेकांची नावं आता हळूहळू पुढे येऊ लागली आहेत. उध्दव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडीचं सरकार पाडण्यात ज्या काही घटना घडल्या त्यामागच्या घडामोडी पाहिल्या की भाजपने महाराष्ट्राचं राजकारण किती खाली नेलं हे दिसून येतं. आघाडी सरकारमधले गृहमंत्री अनील देशमुख यांच्यावरील ईडीच्या कारवाईत समित कदम नावाच्या व्यक्तीचा उल्लेख होतो आहे.
या कदमचं नाव देवेंद्र फडणवीस यांच्याबरोबर घेतलं जात असल्याने कदम नावाची ही व्यक्ती खरं बोलेल याची अजिबात खात्री नाही. तो जर खरं बोलला तर त्याचं आणि त्याच्या परिजनांचं काही खरं नाही. सध्या या कदमला वाय दर्जाची सुरक्षा आहे. फडणवीसांच्या गृह खात्याचं कदमांना हे बक्षीस होय. ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते श्याम मानव यांनी देशमुखांच्या अटकेचा दिलेला हवाला आणि त्यानंतर देशमुखांनी फडणवीस यांच्यावर रोखलेला बाण लक्षात घेता देशमुखांशिवाय दुसरं कोणी असतं तर उध्दव, आदित्य आणि अजित पवार हे आज अटकेत असते. जे दिल्लीत केजरीवालांचं आणि मनिष शिसोदियांचं झालं तेच या तिघांचं झालं असतं.
या प्रकरणाचा उलगडा झाल्यावर फडणवीस आणि त्यांना मदत करणारा समित कदम गप्प बसतील, अशी अपेक्षा होती. ईडीच्या तुरुंगात असताना देशमुखांनीच आपल्याला तडजोड करण्यासाठी बोलवल्याचं समित खुलेआम सांगत होता. तर देशमुखांच्या अटकेसाठी पवार, उध्दव प्रयत्नात होते, असा बालीश आरोप करत फडणवीसांनी तीर मारण्याचा प्रयत्न केला. मात्र तो त्यांच्याच अंगलट आला. ईडीच्या मुख्यालयात ज्या काही थोडक्या व्यक्तींची उठबस होती त्यात मुलुंडच्या किरीट सोमय्यांनंतर आणखी एक नाव पुढे आलं ते म्हणजे या समित कदमांचं. राज्यात असे एक कदम नाहीत. महाराष्ट्राच्या राजकारणाची वासलात लावणारे ईडीने असे अनेक कदम पोसलेत.
देशमुख यांच्या अटकेचं मुळ मुकेश अंबानी यांच्या पेडर रोडवरील अंटेलिया या इमारतीच्या परिसरात जिलेटीन जप्त करण्यात आहे. मनसुख हिरेन नामक व्यक्तीची जिलेटीनने भरलेली स्कॉर्पिओ अंटेलियाच्या परिसरात पार्क करण्यावरून सारं प्रकरण घडलं. २५ फेब्रुवारी २०२१ ची ही घटना. हे वाहन पार्क करण्यात आलं तेव्हा पोलीस मुख्यालयातील क्राईम ब्रांचच्या एका अधिकार्याची इनोव्हा त्याच परिसरात घुटमळत होती. ज्या ड्रायव्हरने स्कॉर्पिओ पार्क केली तो ड्रायव्हर या इनोव्हाने परत गेला. राष्ट्रीय सुरक्षा संस्थेच्या तपासात याच ठिकाणी पीपीई कीटमध्ये एक व्यक्ती वावरत असल्याचं तेव्हा आढळून आलं. या हालचालीतील व्यक्ती ही दुसरी तिसरी कोणीही नसून ती म्हणजे सचिन वाजे हा पोलीस अधिकारी होता, हे पुढे स्पष्ट झालं.
ज्याच्या गाडीचा वापर स्फोटकं ठेवण्यासाठी केला त्या मनसुख हिरेन या व्यक्तीची स्कॉर्पिओ दुरुस्तीसाठी ऐरोलीच्या गॅरेजमध्ये ठेवण्यात आली होती. ही स्कॉर्पिओ तिथून अचानक गायब झाली. आपलं वाहन चोरीला गेल्याची तक्रार लागलीच हिरेन याने विक्रोळी पोलीसांत केली. हीच ती गाडी जी अंटेलियापुढे जिलेटीनसह ताब्यात घेण्यात आली. हे घडता घडता स्कॉर्पिओ मालक हिरेन मनसुख याचा घातपाती मृत्यू झाला. एका खाडीत त्याचा मृतदेह सापडला. जिलेटीन पेरून मुकेश अंबानी यांच्या ‘अंटेलिया’वरून हॅलिकाप्टर उडवण्यास संमती देणारा अहवाल सादर करण्याचा डाव यामागे होता. माजी पोलीस आयुक्त परबिंदर सिंह हाच यामागचा मास्टर माईंड होता, हे पुढे स्पष्ट झालं. यातून मिळणार्या रक्कमेचा तो आणि सचिन हा वाटेकरी होता, हे स्पष्ट होऊ लागताच परबिंदर सिंह याच्याकडील मुंबईची जबाबदारी काढून घेण्याचा निर्णय उध्दव ठाकरेंच्या सरकारने घेतला आणि त्याला होमगार्डच्या साईड पोस्टींगवर पाठवण्यात आलं.
परबिंदर रागावला होता. या प्रकरणाची चौकशी राष्ट्रीय सुरक्षा संस्थेकडून होत असताना परबिंदर अचानक दिल्लीत गेला. मुंबईत येऊन उध्दव ठाकरेंना पत्र लिहिलं. ज्यांनी बदली केली त्या गृहमंत्री अनील देशमुखांनी आपल्याकडे १०० कोटी रुपये मागितल्याचा आरोप केला. या आरोपांचा पध्दतशीर गैरवापर करत केंद्रीय सत्तेकरवी राष्ट्रीय सुरक्षा संस्थेकडे असलेला हा तपास ईडीकडे देण्यात आला. राष्ट्रीय सुरक्षा संस्थेकडील चौकशी सुरू असताना ईडीने यात उडी घेणं हे अनपेक्षित होतं. पुढे राष्ट्रीय सुरक्षा संस्थेच्या चौकशीचं काय झालं? स्फोटकं कोणी ठेवली होती? सचिन वाझे याने हे कोणाच्या सांगण्यावरून केलं? याचं उत्तर अखेरपर्यंत मिळालंच नाही. हे सारं एक व्यक्ती घडवत होती, ती म्हणजे देवेंद्र फडणवीस. असा खुलेआम आरोप अनील देशमुख उघडपणे करतात.
उध्दव ठाकरे यांचं सरकार पाडण्यासाठी अनील देशमुख यांना प्यादं करता येऊ शकतं, हे मनाशी हेरून ईडीच्या हालचाली सुरू झाल्या. चौकशीत अनेक गोष्टींचा खुलासा झाला. गृहमंत्री असलेल्या अनील देशमुख यांच्या घरांबरोबरच खासगी कार्यालयावरही धाडी पडू लागल्या. आजवर कोणावरच पडल्या नाहीत, इतक्या म्हणजे जवळपास ३५ वेळा ईडीने देशमुखांच्या घरी आणि कार्यालयांवर धाडसत्र अवलंबलं. पण देशमुख बधत नाहीत, हे लक्षात आल्यावर त्यांना अटक करण्यात आली. अटक झाल्यावर इतरांची नावं घेण्यासाठी समित कदम नावाच्या इसमाची मदत घेण्यात आली. आजवर कदम नावाची ही व्यक्ती कुठल्याच घटनांमध्ये नव्हती. ती अचानक पुढे येणं ती थेट ईडीच्या तुरुंगात पोहोचणं, तिला अनील देशमुखांनी बोलवून घेणं या सार्या गोष्टी अनकलनीयच. ठरवून रचावी अशा घटना कदमाच्या तोंडून वदवल्या जाऊ लागल्याचं स्पष्ट दिसतं.
अडचणीत आलेल्या देशमुखांकडून उध्दव ठाकरे, अजित पवार, अनील परब आणि आदित्य ठाकरे यांची नावं सहज घेतली जाऊ शकतात, असा विश्वास या मंडळींना होता. या मंडळींनी १०० कोटी जमा करायला सांगितल्याच्या खोट्या आरोपाच्या प्रतिज्ञापत्रावर स्वाक्षर्या करण्यासाठी देशमुखांवर प्रचंड दबाव होता. हे प्रतिज्ञापत्र समित कदम हा थेट आपल्याकडे घेऊन येत होता, असा आरोप देशमुखांनी केला आहे. प्रतिज्ञापत्रावर सही करण्यास नकार दिल्यावर अजित पवारांचं नाव काढून उध्दव, परब आणि आदित्यचं नाव घेऊन त्यांच्यावर १०० कोटींचा खोटा आरोप करणारं दुसरं प्रतिज्ञापत्र पाठवण्यात आलं. मात्र खोटा आरोप करणं हे आपल्या स्वभावात नाही. गरज पडली तर मरण पत्करू पण प्रतिज्ञापत्रावर सही करणार नाही, असा बाणा देशमुखांनी दाखवला. त्यानंतर जवळपास १३० दिवस देशमुखांना तुरुंगात डांबण्यात आलं. इतकी क्रूरता महाराष्ट्राच्या इतिहासात प्रथमच घडत होती.
प्रश्न पडतो तो हा की, हा कदम भाजपच्या गळाला लागला कसा? समित कदम हा सांगलीच्या मिरजमध्ये राहणारा. जनसुराज्य युवा शक्ती नावाच्या पक्षात तो २००८ पासून कार्यरत आहे. नेते कोणीही असोत, आपलं महत्व वाढवण्यासाठी समित नेत्याच्या आगेमागे वळवळत असल्याचं अनेकजणांनी पाहिलंय. मंत्री असताना तो अगदी अदित्य ठाकरेंच्याही जवळ पोहोचला होता. आज या समितकडे जनसुराज्य पक्षाचं प्रदेशाध्यक्ष पद आहे. या पक्षात असल्यापासून त्याचे अनेकांशी सलोख्याचे संबंध आहेत. त्यात फडणवीस यांचं नाव आवर्जून घेतलं जातं. हा कदम आज वाय दर्जाच्या सुरक्षेच्या कवचात फिरतो. आगामी काळात तो निवडणूक लढवून मंत्रीही बनू शकतो, असं चित्र त्याने मिरजेत तयार केलं आहे. माजी मंत्री असलेले विनय कोरे यांचा हा पक्ष. काँग्रेस विचारांशी समरस असलेल्या ज्या-ज्या नेत्यांनी भीतीपोटी भाजपचा आसरा घेतला त्यात विनय कोरेंचं नाव घेतलं जायचं. याच पक्षाचा कार्यकर्ता म्हणजे समित होय.
असे कार्यकर्ते हेरायचे आणि त्यांना विरोधकांच्या कळपात कामाला लावायचं तंत्र फडणवीसांसारख्यांनी पध्दतशीरपणे अवलंबलं आहे. ईडीचा इतका धाक असताना हा माणूस थेट कथित आरोपीपर्यंत पोहोचतो आणि तिथे पोहोचल्यावर तो देशमुखांनी बोलवल्याचं चक्क उघड खोटं बोलतो, याचं नवल वाटतं. ज्या पत्राचा आधार ईडीने घेतला त्या परबिंदर याचं काय झालं? त्याने केलेल्या आरोपासंबंधी चांदिवाल आयोगाला त्याच्याविरोधात वॉरंट काढावं लागलं. या माणसाने एकट्या मुंबई पोलिसांनाच बदनाम केलं असं नाही तर महाराष्ट्राला मान खाली घालायला लावली आहे. या सरकारने जिलेटीन प्रकरणातून त्याला खुलेआम क्लिनचिट दिलीच. शिवाय रोखण्यात आलेलं प्रमोशन पुन्हा बहाल करून देणी देत त्याच्यावर उपकराच केले. असल्या घाणेरड्या राजकारणामुळेच महाराष्ट्रात भाजपची पिछेहाट होऊ लागली आहे. आता विधानसभेतही तोच कित्ता गिरवला जाईल, असंच वर्तन फडणवीसादींचं आहे. एक मात्र खरं देशमुखांच्या जागी दुसरं कोणी असतं तर आज उध्दव, आदित्य, अजित पवार आणि अनील परब यांना केजरीवालांसारखं तुरुंगात डांबायला सत्तेने कमी केलं नसतं.
(लेखकाशी संपर्क – ८१६९१३५२५३)


